पुणे -विविध प्रकारचा माल घेऊन येणाऱ्या मोठ्या वाहनांना थेट बाजारात प्रवेश दिल्यास वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. वाहतूक कोंडीचा थेट व्यापारावर परिणाम होणार आहे. त्यामुळे मोठ्या वाहनांमुळे बाजारात वाहतूक कोंडी झाल्यास कामगार संघटनेतर्फे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड कामगार संघटनेचे अध्यक्ष संतोष नांगरे यांनी दिला आहे.
पूर्वी गाळ्याच्या समोर वाहने लावून मालाची विक्री केली जात होती. त्यामुळे रस्ता बंद झाला, की संपूर्ण विभागात वाहतूक कोंडी होत होती. या वाहतूक कोंडीचा खरेदीदारांना फटका बसत होता. वाहतूक कोंडीमुळे माल घेऊन येणाऱ्या गाड्यांना गाळ्यावर पोहचण्यास विलंब होत होता. त्याचा फटका शेतकऱ्यांना तसेच आडत्यांना सहन करावा लागत होता. त्यामुळे पालेभाज्यांचा व्यापार केळी आणि गुरांचा बाजारात विक्रीसाठी चार नंबरच्या प्रवेशद्वाराशेजारी जागा उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यामुळे भाजीपाला विभागातील वाहतूक कोंडीला आळा बसला होता. मात्र, पुन्हा एकदा या गाड्या आत सोडण्याचा तसेच पालेभाज्या विक्रेत्यांचे बाजारात स्थलांतर करण्याचा निर्णय बाजार समितीने घेतला आहे. त्यामुळे पुन्हा वाहतूक कोंडी होण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचे संतोष नांगरे यांनी सांगितले.
बाजार समितीच्या निर्णयाला आमचा विरोध नाही. मात्र, वाहतूक कोंडी होऊन त्याचा व्यवहारावर परिणाम झाल्यास त्यास जबाबदार कोण? विशेष म्हणजे, पालेभाज्यांच्या व्यापारासाठी अधिकची जागा लागत असते. त्यामुळे भाजीपाला विभागात नक्कीच वाहतूक कोंडी होते. तसेच व्यापाऱ्यांचा गाळा मालाने भरल्यास उर्वरित मालाची विक्री गेट क्रमांक चार येथील शेडमध्ये करावी. त्यामुळे व्यापारावर परिणाम होणार नाही. बाजारात सुरळीत सुरूच राहिल. तसेच गेट क्रमांक चार येथे जानेवारीपासून टेम्पोला आकारण्यात येणारा शुल्क थांबविण्याचे ठरले असतानाही टेम्पोकडून पैसे घेऊन प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे वाहनांच्या रांगा लागत आहेत. वाहतूक कोंडीमुळे खरेदीदार परत जात आहेत. त्यामुळे बाजार सुरळीत सुरू ठेवण्यासाठी पालेभाज्या विक्रेत्यांचे स्थलांतर करून नये. गाळ्यासमोर गाड्या थांबवून माल विक्रीला परवानगी देऊ नये, अशी आमची मागणी असल्याचेही संतोष नांगरे यांनी सांगितले.