लाखणगाव – लम्पी आजारामुळे बंद केलेले जनावरांचे बाजार पुन्हा सुरू करावेत, अशी मागणी शेतकरी, गोपालक आणि व्यापारी यांनी पशुसवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून लम्पी आजारामुळे जनावरांचे बाजार, यात्रा, जत्रा पशुसवर्धन विभागाने बंद केले आहेत. प्राण्यांचे बाजार बंद असल्याने अनेक शेतकरी अडचणीत आले आहेत.
पश्चिम महाराष्ट्रात लम्पीचा प्रादुर्भाव कमी असल्यामुळे जनावरांचे बाजार पुन्हा एकदा सुरू करावेत. बाजार बंद असल्याने जनावरांची खरेदी-विक्री थांबली आहे, त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना जनावरे विकायची आहेत त्यांना मागील तीन-चार महिन्यांपासून जनावरांना चारापाणी करून सांभाळावे लागत आहे.त्यांचा आर्थिक खर्च वाढत चालला आहे. जनावरांच्या बाजारावर अनेक लोकांचे प्रपंच उभे आहेत.
यामध्ये व्यापारी, शिंगे साळनार, दावे मोरखी बनवणारे, हॉटेलवाले, गाडी वाहतूकदार या सर्वच लोकांना मिळणारा रोजगार बंद झाला आहे, त्यामुळे शासनाने लवकरच बाजार सुरू करावेर, अशी मागणी होत आहे.
लम्पीमुळे जनावरांचे बाजार बंद आहेत. बाजार सुरू केल्यास लम्पीचा प्रादुर्भाव वाढेल अशी भीती शासनाला आहे, त्यासाठी गाय, बैल बाजारात विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्याकडून लम्पीची लस घेतल्याचे प्रमाणपत्र तपासूनच त्यानंतर संबधित शेतकऱ्यांना बाजारात प्रवेश द्यावा.
– वसंतराव बाणखेले, अध्यक्ष, मंचर पाणीपुरवठा योजना.
लम्पीचा प्रादुर्भाव कमी असणाऱ्या परिसरामध्ये यात्रांना परवानगी मिळाली आहे. मात्र, अजूनही जनावरांच्या बाजाराला परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे ज्या परिसरात लम्पीचा प्रादुर्भाव कमी आहे अशा परिसरात बैल, गाय, शेळ्यांचे बाजार पूर्ववत सुरू करावेत.
– के. के. थोरात, बैलगाडा मालक, मंचर
ज्या शेतकऱ्यांना नवीन जनावरे शेती कामासाठी, शर्यतीसाठी, दूध धंद्यासाठी खरेदी करायची आहेत, त्यांना बाजार बंद असल्याने जनावरे खरेदी करता येत नाहीत. परिणामी विक्रेता व ग्राहक या दोघांचीही अडचण होत आहे.
– जयसिंगराव एरंडे, प्रसिद्ध बैलगाडा मालक