सातारा – सातारा पालिकेच्या महिला सफाई कामगाराला धक्काबुक्की व शिवीगाळ झाल्याने पालिकेच्या सफाई कामगारांनी सोमवारी काम बंद आंदोलन केले. या आंदोलनामुळे शहराच्या कचरा संकलनावर विपरीत परिणाम झाला. पालिकेच्या कर्मचारी संघटनेने मुख्याधिकारी अभिजीत बापट यांची भेट घेऊन या प्रकरणात मध्यस्थी करण्याची मागणी केली आणि सफाई क ामगारांना संरक्षण मिळावे, असे निवेदन सादर केले.
येथील केसरकर पेठेत सफाईच्या कारणावरून शनिवारी एका महिला कर्मचारी आणि स्थानिकांमध्ये वाद झाला होता. वादानंतर त्या ठिकाणी एकमेकांना धक्काबुक्की व शिवीगाळ करण्याची घटना देखील घडली. याप्रकरणी सफाई कामगारांनी शहर पोलीस ठाण्यात गर्दी करत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. सफाई कामगार महिलेने नोंदवलेल्या तक्रारीनुसार श्रीकांत विलास माने व एक महिला यांच्या विरोधात ऍट्रॉसिटीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याच घटनेच्या अनुषंगाने एका महिलेने नोंदवलेल्या फिर्यादीनुसार पालिकेच्या आरोग्य निरीक्षक सागर बडेकर आणि एका अनोळखीवर विनयभंगाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या प्रकरणाचे तीव्र पडसाद सोमवारी उमटले सकाळच्या सत्रातील सातारा शहराचे कचरा संकलन सुरू असताना अचानक नऊच्यानंतर सफाई कामगार आणि घंटागाडी चालक आणि काम बंद आंदोलन केले. सकाळी दहा वाजता सातारा पालिकेच्या प्रवेशद्वारावर कर्मचाऱ्यांनी गर्दी करत निदर्शने केली. त्यामुळे सातारा शहराच्या अनेक भागांमधील कचरा तसाच पडून राहिला. प्राप्त मा हितीनुसार केवळ 30 टन कचऱ्याचे संकलन होऊ शकले.
कर्मचारी संघटना आणि सफाई कामगारांनी थेट पालिकेत येऊन मुख्याधिकारी अभिजीत बापट यांची भेट घेतली आणि महिला सफाई क ामगार यांना तातडीचे संरक्षण मिळावे किंवा या संदर्भात ठोस उपाय योजना पालिकेने जाहीर करावी अशी मागणी त्यांनी केली. तसेच आरोग्य निरीक्षक सागर बडेकर यांच्यावरही विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी सुद्धा प्रशासनाने तातडीची भूमिका घ्यावी, अशी आग्रही मागणी करण्यात आली. दरम्यान, मुख्याधिकारी बापट यांनी यासंदर्भात सातारा शहर पोलीस ठाण्याची पत्रव्यवहार करू आणि सफाई कामगारांच्या संदर्भात लवकरच संरक्षणाचे योग्य ते धोरण जाहीर केले जाईल, असे आश्वासन दिले.