रांजणी -शिक्षक संघटनेने जुन्या पेन्शन योजनेच्या पार्श्वभूमीवर पुकारलेला मुद्दा ऐरणीवर आल्याने दहावी आणि बारावीच्या परीक्षा जरी वेळेत सुरू झाल्या असल्या तरी निकाल मात्र लांबणीवर पडणार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान मंगळवारी (दि. 14) मार्चपासून जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाची हाक दिली. या हाकेला ग्रामीण भागात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, यामुळे दहावी आणि बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर संकट येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान आंबेगाव तालुक्यात दहावीच्या परीक्षा चालू असून या परीक्षेमध्ये कोणत्याही प्रकारचे विघ्न न आणण्याचे आश्वासन शिक्षक ांनी दिले आहे; परंतु जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी शिक्षक संघटना आग्रही असल्याचे शिक्षकांनी सांगितले, त्यामुळे संप क ाळात दहावी आणि बारावीच्या उत्तर पत्रिका न तपासण्याचा पवित्रा शिक्षक संघटनांनी घेतलेला दिसून येऊ लागला आहे.
मागील महिन्यात कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले होते. बारावी बोर्ड परीक्षेच्या पेपर तपासणीवर आणि कामावर बहिष्कार घातला होता. आता देखील 14 मार्चपासून पुन्हा बेमुदत संप करण्यात आला असून या संपाला अनेक शिक्षक संघटनांनी पाठिंबा दिला आहे. या संपात अनेक जण सहभागी झाले आहेत जुनी पेन्शन योजना लागू होईपर्यंत दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय शिक्षक संघटनांनी घेतला आहे.
शिक्षकांच्या या बहिष्कारामुळे शिक्षक संघटनेच्या संपाचा फटक ा दहावी आणि बारावीच्या परीक्षा आणि निकालांना बसणार का, अशी भीती विद्यार्थी आणि पालक वर्गातून व्यक्त होत असतानाच राज्य सरकारने संप मागे घेण्याचे आवाहन केले आहे.मात्र या आवाहनाला कोणत्याही प्रकारची दाद संघटनेच्या माध्यमातून देण्यात येत नसल्याने हा संप चिघळण्याची शक्यता अधिक आहे.
संपात सहभागी झालेल्यांमध्ये राज्य कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक महासंघ, शिक्षक भारती महाराष्ट्र शिक्षक सेना, राज्य खाजगी प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघ संपात सहभागी झाले आहेत. एकूणच सध्या शिक्षक संघटनांनी जुनी पेन्शन योजना लागू होण्याच्या पार्श्वभूमीवर घेतलेला संपाचा निर्णय हा शालेय विद्यार्थ्यांसाठी मारक असून त्यावर तोडगा निघणे गरजेचे आहे.