पुणे – राज्य शासन रिक्षाचालकांसाठी 1,500 रुपयांचे अनुदान त्यांच्या बॅंक खात्यात जमा करत आहे. मात्र, अनेक रिक्षाचालकांचे पैसे किमान खाते शुल्काच्या नावाखाली बॅंक वजा करत असल्याचे समोर आले आहे. अशा प्रकाराने रिक्षाचालक मात्र हतबल झाले आहेत.
रिक्षा चालकांनी ऑनलाइन अर्ज केल्यानंतर त्यांच्या बॅंक खात्यात 1,500 रुपये जमा होत आहेत. पण, गेल्या वर्षभरापासून करोना आणि लॉकडाऊनमुळे अनेकांचे बॅंकखात्यात रक्कम शिल्लक नाही. काहींच्या कर्जाचे हप्तेही थकले आहेत.
त्या खात्यामधे अनुदान जमा झाल्यामुळे अनेक बॅंका “मिनिमम बॅलन्स चार्ज’च्या नावाखाली अनुदानातील पैसे कमी करत आहेत. हे म्हणजे सरकारने रिक्षाचालकाला एका हाताने 1500 रूपये मदत करून दुसऱ्या हाताने परत घेण्यासारखा प्रकार असल्याचा आरोप आम आदमी रिक्षा संघटनेने केला आहे. याबाबत परिवहन मंत्री अनिल परब यांना पत्र लिहिले आहे. हे पैसे बॅंकेने वजा करू नयेत. याबाबत सरकारने प्रयत्न करावेत, अशी मागणी संघटनेने केली आहे.