पुणे – दोन वर्षापूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून तरूणाचा खून केल्याप्रकरणात बिबवेवाडी पोलिसांनी अटक केलेल्या चौघांना 1 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
जावेद उमर शेख (36), त्याचा भाऊ अन्वर (37, रा. दोघेही रा. आण्णाभाऊ साठेनगर, बिबवेवाडी), दीपक उत्तम डाखोरे (21, बालाजीनगर, धनकवडी), विकास दत्तात्रय कापसे (22, रा. आण्णाभाऊ साठेनगर, बिबवेवाडी) अशी पोलीस कोठडी झालेल्यांची नावे आहेत. अक्षय बापु खंडाळे (रा. टिळेकरनगर, कोंढवा) याच्यावर गुन्हा दाखल आहे.
केशव रमेश कांबळे (22, रा. आंबेगाव पठार) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. याबाबत रूपाली युवराज आवारे (28, रा. झांबरे वस्ती, अप्पर डेपोजवळ, अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना 27 ऑगस्ट रोजी रात्री 9 च्या सुमारास बिबवेवाडी भागात घडली होती. पोलिसांनी चौघांना न्यायालयात हजर केले. त्यावेळी सरकारी पक्षाने पोलीस कोठडीची मागणी केली. तर, यास बचाव पक्षातर्फे ऍड. वाजेद खान (बिडकर) यांनी विरोध केला.