पुणे, दि. 10 (संजय कडू) -पुणे शहरातील गुन्हेगारीचा टक्का वाढवण्यात परदेशी नागरिकांचा सहभागही दखल घेण्याजोगा आहे. अमली पदार्थाची विक्री, फसवणूक, सायबर क्राईम आणि अनैतिक व्यापार अशा गुन्ह्यांत परदेशी नागरिकांची संख्या मोठी आहे. हे नागरिक शिक्षण, पर्यटन, व्यवसाय आणि औषधोपचाराच्या नावाखाली शहरात येतात. मागील तीन वर्षांचा विचार करता एकूण 47 परदेशी नागरिकांवर गुन्हे दाखल आहेत.
येथील नावाजलेली महाविद्यालये, पर्यटन स्थळे, औषधोपचार, औद्योगिक क्षेत्र आणि सुरक्षितता लक्षात घेऊन परदेशी नागरिकांचा शहराकडे ओढा जास्त दिसतो. अफगाणिस्तान, इराक, इराण, नाजेरियातील तरुणांकडून पुण्यात शिक्षण घेण्यास प्राधान्य दिले जाते. तर येमेनमधून उपचारासाठी परदेशी नागरिक मोठ्या प्रमाणात येतात. मात्र काही परदेशी नागरिक खास अमली पदार्थाच्या तस्करीसाठी शहरात येतात.
नायजेरियनचा मोठा सहभाग
नायजेरीयन नागरिक अमली पदार्थांच्या व्यवसायात मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांच्याकडून एमडी पावडर आणि मेफेड्रोनची मोठ्या प्रमाणात विक्री होते. यासाठी ऑन लार्सन पद्धतीने आमंत्रण देऊन पार्ट्यांचे आयोजनही केले जाते. याशिवाय तरुण आणि आयटी कर्मचाऱ्यांना अमली पदार्थांची ऑनलाइन विक्री केली जाते.
शहरात स्पा सेंटर आड चालणाऱ्या हाय प्रोफाईल वेश्या व्यवसायामध्ये परदेशी महिलांची संख्या जास्त आहे. यामध्ये थायलंडमधील महिला अधिक आढळतात. मागील तीन वर्षांतील कारवाईत 15 परदेशी महिलांची सुटका करण्यात आली.
व्हिसाची मुदत संपूनही वास्तव्य
शहरातील कोंढवा, उंड्री, कोरेगाव पार्क, विमाननगर आदी परिसरात परदेशी नागरिक अमली पदार्थांच्या व्यवसायात सक्रीय आहेत. पुणे पोलिसांनी अमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार 2020 मध्ये तीन, 2021 मध्ये दहा आणि 2022 मध्ये आजवर सहा परदेशी नागरिकांवर कारवाई करुन कोट्यवधीचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. बेदरकारपणे वाहने चालवणे, मारामारी, फसवणूक आदी गुन्ह्यात 2020 मध्ये सात परदेशी नागरिकांवर कारवाई करण्यात आली होती. व्हिसाची मुदत संपूनही देश न सोडल्याप्रकरणी तीन वर्षांत 12 परदेशी नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे.
अशी होते गुन्ह्याची नोंद…
परदेशी नागरिकांकडून होणाऱ्या गुन्ह्यांची नोंद परकीय नागरिक विभागाकडून होते.
गुन्ह्याचे स्वरुप लक्षात घेऊन न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण केली जाते.
संबंधित देशाच्या दूतावासाशी संपर्क साधून त्यांना मायदेशी पाठवले जाते.
वारंवार गुन्ह्यात सापडणाऱ्या परदेशी नागरिकांना काळ्या यादीत टाकले जाते.
त्यामुळे त्यांना व्हिसा नाकारला जातो.
व्हिसा संपूनही शहरात बेकायदा रहाणाऱ्यांना “लिव्ह इंडिया’ नोटीस दिली जाते.
परदेशी नागरिकांच्या गुन्ह्यांची माहिती विशेष शाखेकडून नियमित घेतली जाते. त्यांच्या हालचालींवर लक्ष असते. गुन्ह्यात सहभाग आढळल्यास कायदेशीर प्रक्रिया पार पाडून त्यांना मायदेशी पाठवले जाते.
– आर. राजा, उपायुक्त, विशेष शाखा