पुणे – शहरातील प्रमुख रस्त्यांवरील मुख्य चौकांमध्ये होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिका प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. त्या अंतर्गत तीन चौकांमध्ये उड्डाणपूल अथवा भुयारी मार्ग (ग्रेड सेपरेटर) करणे संयुक्तिक होईल, याचा निर्णय घेण्यासाठी सल्लागार नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही माहिती महापालिकेच्या वाहतूक नियोजन व प्रकल्प विभागाकडून देण्यात आली.
येरवडा येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उड्डाणपुलाच्या उद्घाटनप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेस शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी उड्डाणपूल तसेच इतर प्रकल्पांसाठी 2,100 कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली होती. त्याअंतर्गत हे काम केले जाणार आहे. दरम्यान, यात सिंहगड रस्त्यावरील दांडेकरपूल चौक, नगर रस्त्यावरील बिंदूमाधव ठाकरे चौक आणि शास्त्रीनगर चौकाचा या प्रस्तावात समावेश आहे.
तिन्ही चौकांतील वाहतूक सर्वेक्षण, उपलब्ध जागा याचा विचार करून उड्डाणपूल, समतल, विगलक यापैकी काय बांधावे याचा आराखडा सादर केला जाईल. त्यास महापालिकेच्या विविध विभागांकडून ना हरकत मिळाल्यानंतर स्थायी समितीच्या मान्यतेने थेट काम सुरू करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली जाईल. या कामासाठी 2023-24 च्या अर्थसंकल्पात 40 कोटी रुपये तरतूद आहे.
राज्य शासन निधी देणार का?
महापालिकेच्या अंदाजपत्रकात या तीनही चौकांसाठी 40 कोटींची तरतूद असली, तरी राज्य शासनाने शहरातील उड्डाणपूल आणि भुयारी मार्ग तसेच वाहतूक सुधारणांसाठी निधी देण्याची तयारी दर्शविली आहे. त्यासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना महापालिकेस दिल्या आहेत. त्या अंतर्गत पालिकेने सेनापती बापट रस्ता, पुणे विद्यापीठ रस्त्यावर दोन ठिकाणी भुयारी मार्ग अथवा उड्डाणपूल तसेच नवशा मारुती मंदिर ते डीपी रस्ता नदीवरील पुलाचा प्रस्ताव तयार केला आहे. त्या सोबतच हे तीन प्रस्तावही केले जाणार आहेत. शहरात वाहनांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने अस्तित्वातील रस्ते अपुरे पडत आहेत. त्यामुळे महापालिका उड्डाणपूल तसेच भुयारी मार्गांना प्राधान्य देत आहे.
का महत्त्वाचे आहेत हे चौक?
दांडेकर पूल चौक शहराच्या चारही भागांना जोडतो. सिंहगड रस्ता येथूनच सुरू होतो. या चौकात डेक्कन, स्वारगेट, कात्रज आणि सिंहगड रस्त्यावरील वाहतूक एकत्र येते. त्यामुळे हा चौक महत्त्वाचा आहे. शास्त्रीनगर चौकात नगर रस्ता, गोल्फ क्लब चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सर्वाधिक वाहतूक आहे. तर शिवाजीनगरहून नगर रस्ता, विमानतळ, विश्रांतवाडीकडे जाण्यासाठी पाटील इस्टेट येथून सुरू होणारा संगमवाडी रस्ता महत्त्वाचा आहे. हा रस्ता बिंदूमाधव चौक येथे संपतो. वाहनचालकांसाठी सोईचा रस्ता असल्याने याचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे पालिकेने या तीन चौकांना प्राधान्य दिले आहे.