पुणे (सुनील राऊत) – पावसाळ्यात खड्डेमय रस्त्यांपासून पुणेकरांची सुटका करण्यासाठी महापालिकेकडून लवकरच “एफडीआर’ (फुल डेप्थ रिक्लेमेशन) तंत्रज्ञानाचा वापर करून रस्ते तयार केले जाणार आहेत. यात रस्ते मुळापासून उखडून नव्याने रस्ता करण्यासोबतच रस्त्यावर शेवटचा सूक्ष्म थर हा ग्लास फायबर आणि प्लॅस्टिक फायबरचा असणार आहे. त्यामुळे पाणी साचणार नाहीच, शिवाय फायबरमुळे रस्त्याच्या आतील भागातही पाणी जाणार नाही, असा दावा प्रशासनाने केला आहे.
असा होणार फायदा
“एफडीआर’ पद्धतीमुळे पावसाळ्यात रस्ते पुरेसे नेटके राहून, त्यांची आयुर्मयादा पाच वर्षांपर्यंत असणार आहे. पथ विभागाकडून शहरातील तीन रस्त्यांवर प्रायोगिक तत्वावर हे रस्ते विकसित केले जाणार आहेत. तसेच, या रस्त्याच्या दोष दायित्व कालावधीही 3 ऐवजी पाच वर्षांचा असणार आहे. अशा तंत्रज्ञानाचा वापर करून महापालिका पहिल्यांदाच रस्ते विकसित करणार आहे.
“एफडीआर’ पद्धत नेमकी कशी?
“एफडीआर’ तंत्रज्ञानाद्वारे रस्ते विकसित करण्यासाठी अत्याधुनिक मशीन वापरण्यात येतात. त्यात रस्ता मुळापासून उखडून काढला जातो. हा राडारोडा इतरत्र न टाकता तो त्याच मशिनमध्ये एकत्र करून पुन्हा खोदलेल्या रस्त्यावर त्याचा थर टकला जातो. या थरावर रोलर फिरवून त्यावर डांबर, खडीचे मिश्रण टाकून मुख्य थर तयार केला जातो. शेवटच्या थरावर ग्लास फायबर आणि प्लॅस्टिक फायबरचे मायक्रोसर्फेसिंग केले जाते. त्यामुळे पहिल्या थरातून पावसाचे पाणी रस्त्याच्या खालच्या दोन्ही थरांपर्यंत जाण्यास मज्जाव होतो.रस्त्यावर पाणी साठले, तरी ते आत झिरपत नाही आणि रस्ता खराब होण्याचे प्रमाण नगण्य राहते. परिणामी, इतर रस्त्यांसाठी तीन वर्षांचा दोष दायित्व कालावधी असेल तर या रस्त्यासाठी हा कालावधी पाच वर्षांचा असणार आहे.
हे आहेत “एफडीआर’चे फायदे
रस्त्याचे आयुर्मान 3 वरून 5 वर्षांपर्यंत वाढणार
रस्ता खोदल्यानंतर राडारोडा जागेवरच वापरणार
फायबर कोटिंगमुळे रस्त्यवर खड्डे पडण्याचे प्रमाण नगण्य
प्रायोगिक तत्वावर या तीन रस्त्यांचा समावेश
दत्तनगर चौक ते भूमकर चौक – कात्रज
अपर इंदिरानगर ते व्हीआयटी रस्ता – बिबवेवाडी
शंकरशेठ रस्ता – स्वारगेट
रस्ते विकसित केल्यानंतर त्यावर सातत्याने वर्दळीमुळे पावसाळ्यत ते कमकुवत होतात. परिणामी, काही वर्षांत ते पुन्हा नव्याने करावे लागतात. मात्र, “एफडीआर’ तंत्रज्ञानामुळे रस्ता मुळापासून तयार केला जाईल. शिवाय वरच्या भागावर ग्लास फायबर आणि प्लॅस्टिक फायबरचे मायक्रो सर्फेसिंग केले जाणार असल्याने पावसाळ्यात खालचा स्तर खराब होणार नाही. परिणामी, रस्ते खड्डेमुक्त तसेच दीर्घकाळ टिकण्यास मदत होणार आहे.
– साहेबराव दांडगे, अधीक्षक अभियंता, पथ विभाग, मनपा