पुणे – राज्यातील कारागृहांतील कैद्यांना आंघोळीसाठी गरम पाणी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेण्यात आला असून कारागृह विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी याबाबतचे आदेश दिले आहे.
राज्यातील कारागृहांत कच्चे कैदी (न्यायाधीन बंदी) तसेच शिक्षा झालेल्या कैद्यांच्या समस्या, अडचणी जाणून घेण्यात येत आहे. राज्य कारागृह विभागाकडून राज्यातील सर्व कारागृहातील उपमहानिरीक्षक आणि मध्यवर्ती कारागृहांचे अधीक्षकांची बैठक आयोजित करण्यात आली. हिवाळा आणि पावसाळ्यात कैद्यांना गरम पाणी उपलब्ध करुन देण्याचे आदेश गुप्ता यांनी या बैठकीत दिले. कैद्यांना नातेवाईकांशी संवाद साधण्यासाठी दूरध्वनी सेवा उपलब्ध करुन देण्यात येते. ही सुविधा वाढविण्यात येणार असून थंडीत चादर, सतरंजी, उशी उपलब्ध करुन देण्याची मागणी कैद्यांकडून करण्यात आली आहे. त्यानुसार कार्यवाही होणार आहे.
189 कैद्यांची शिक्षा माफ
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त कारागृहात वेगवेगळ्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या राज्यातील 189 कैद्यांची शिक्षा माफ करण्यात येणार आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त केंद्रीय गृहमंत्रालयाने कारागृहात चांगली वर्तणूक असलेल्या देशभरातील कैद्यांची शिक्षा माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. चांगली वर्तणूक तसेच निम्मी शिक्षा भोगलेल्या कैद्यांची शिक्षा माफ करण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालयाने घेतला आहे. यामध्ये महिला, पुरुष तसेच तृतीयपंथीय कैद्यांचे वय 50 वर्षांपेक्षा जास्त आहे. ज्यांनी शिक्षेचा 50 टक्के कालावधी पूर्ण केला आहे. तसेच दिव्यांग, दुर्धर आजाराने ग्रस्त असलेले कैद्यांना विशेष माफी देण्यात येणार आहे. चांगली वर्तणूक असलेल्या कैद्यांनी शिक्षेचा कालावधी पूर्ण केला आहे. मात्र, त्यांना न्यायालयीन दंडाची रक्कम भरता न आल्याने कारागृहातून त्यांची मुक्तता झाली नाही. अशा कैद्यांना विशेष माफी देऊन त्यांची मुक्तता करण्यात येणार आहे.