पुणे – खडकवासला ते फुरसुंगी दरम्यान सुमारे ३० कि.मी. लांबीचा कालवा आणि बेबी कालव्याचे महापालिकेकडून करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणात ७ लाख ७७ हजार ३२९ चौरस मीटर जागेवर अतिक्रमण असल्याचे निदर्शनास आले आहे. खडकवासला धरण ते फुरसुंगी दरम्यान कालवा बंद करून बोगद्यातून पाणी नेण्याची योजना जलसंपदा विभागाकडून तयार करण्यात आली आहे. जलसंपदा विभागाने तयार केलेल्या या प्रकल्पाचा विस्तृत प्रकल्प अहवालास राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीने (स्टेट लेव्हल टेक्निकल अॅडव्हायजरी कमिटी) मान्यता दिली आहे.
अंतिम मान्यतेसाठी हा प्रस्ताव राज्य सरकारच्या स्तरावर पडून आहे. सुमारे दीड हजार कोटींची ही योजना आहे. या योजनेमुळे सुमारे अडीच टीएमसी पाण्याची बचत होणार आहे. या प्रकल्पासाठी एशियन बँकेने कर्ज देण्याची तयारी दर्शविली आहे. दरम्यान, प्रकल्पाचे काम सुरू झाल्यानंतर तो पूर्ण होण्यास किमान तीन वर्षांचा कालावधी लागणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर कालव्याची जागा उपलब्ध होणार आहे. या जागेचा उपयोग व्यावसायिक कारणांसाठी करता येणे शक्य आहे, त्यानुसार महापालिकेने कालवा बंद केल्यानंतर नेमकी किती जागा उपलब्ध होऊ शकते.
त्याजागेचा काय वापर करता येईल, याचे सर्व्हेक्षण करण्यासाठी एका सल्लागार कंपनीची नियुक्ती केली होती. सर्व्हेक्षणात खडकवासला धरणाच्या भिंतीपासून ते फुरसुंगीपर्यंत कालव्याच्या दोन्ही बाजूस मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाली असल्याचे निदर्शनास आले आहे.