मुंढवा (मनोज गायकवाड)- मुंढवा येथील मुळा-मुठा नदीवर पूल बांधण्यात आला मुंढवा-खराडी वाहतूक कोंडीवर हा पूल उपयोगी ठरत आहे. परंतु, या पुलाचे बांधकाम करताना पाणी अडविण्यासाठी तसेच यंत्रसामुग्रीची वाहतूक करण्यासाठी नदीपात्रात छोटा बंधारा घालण्यात आला होता. पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर सदर बंधारा काढून टाकणे गरजेचे असताना गेली कित्येक वर्षे तो तसाच ठेवण्यात आल्याने पाणी अडून त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जलपर्णी साचत आहे. यामुळे महापालिका प्रशासनासह बांधकाम विभाग आणि ठेकेदारा कंपनीच्या कामाचा नमूना सातत्याने चर्चेत येत आहे.
“डास पैदास केंद्र’
मुळा-मुठा नदीपात्रात पाणी साचून राहत असल्याने जलपर्णी मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने डासांसह अन्य किटकांची मोठ्या प्रमाणात पैदास होत आहे. यातून मुंढव्याची ओळख आता “डास पैदास केंद्र’ अशी होऊ लागली आहे. नदीपात्रालगत डासांचे प्रमाण मोठे आहे. किटनाशकाची फवारणी करूनही फरक पडत नसल्याने जलपर्णी काढण्याची मागणी होत आहे. केशवनगर परिसरात कचरा डेपोमुळेही डास तसेच किटकांची मोठी पैदास या परिसरात होत आहे. उघड्यावरच कचरा साचत असल्याने यावर कायमस्वरूपी उपाया योजना करावी, कचरा डेपो अन्यत्र स्थलांतरीत करण्यात यावा अशी मागणीही होत आहे.
यामुळे साचते जलपर्णी…
मुळा-मुठा नदी पात्रातील जलपर्णी काढण्याचे काम गेल्यावर्षी सुरू करण्यात आले होते. परंतु, मूळ समस्या नवीन पुला खाली नदीपात्रात राडारोडा टाकुन तयार केलेला बांध आहे. जो पर्यंत हा बांध काढला जात नाही, तोपर्यंत जलपर्णी हटणार नाही. मुंढव्याच्या बाजूच्या फक्त दोन मोऱ्यांमधून पाणी वाहते तसेच खराडीच्या बाजूच्या पुलाच्या तीन मोऱ्यांमधून पाणी जात नसल्याने येरवड्याच्या बाजूने वाहत येणारी जलपर्णी मुंढवा नदीपुलालगत अडकून राहत आहे.
डासांच्या त्रासामुळे नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. याबाबत हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालयाचे उपायुक्त काटकर यांच्याकडे जलपर्णी काढण्याची मागणी केली आहे. तसेच सर्व परिसरात औषध फवारणीही करण्यास सांगितले आहे.
– संदीप लोणकर, शहर सरचिटणीस, पुणे भाजपा
जलपर्णीचा हा प्रश्न कित्येक वर्षापासून आहे. प्रशासनाने यावर कायमचा तोडगा काढायला हवा. प्रशासन भरमसाठ टॅक्स घेते. परंतु, नागरिकांच्या आरोग्याकडे लक्ष देत नाही, आम्हाला वारंवार संबंधित विभागाशी भांडावे लागत आहे.
– पूजा कोद्रे, लोकप्रतिनिधी