बारामती – महाराष्ट्रातील धनगर समाजाची नोंदणीकृत संघटना असलेल्या यशवंत सेनेने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना भेटीची वेळ मागितली आहे. याबाबत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले, प्रदेशाध्यक्ष प्रा. माणिकराव दांगडे पाटील यांनी त्यांना पत्र तसेच मेल पाठविला आहे.
भारत देशाच्या प्रथम नागरिक आणि सर्वोच्च सत्ताकेंद्र या नात्याने महाराष्ट्रातील समारे 2 कोटी धनगर समाजाच्या पुढील व्यथा व सद्यस्थिती मांडण्यासाठी आम्हास भेटीची वेळ देण्याची विनंती पत्रात नमूद करण्यात आली आहे. धनगर समाज महाराष्ट्रातील एकूण लोकसंख्येच्या तुलनेत दोन क्रमांकावर आहे. त्याचे प्रमाण साधारणतः 17 ते 18 टक्के इतके आहे.
मागील अनेक वर्षापासून महाराष्ट्रातील धनगर समाज शांततामय मार्गाने विविध आंदोलने करीत आहे. प्रत्येकवेळी केंद्र तसेच राज्य सरकार धनगर सामाजाच्या घटनात्मक मागणी आहे. धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती आरक्षण अमलबजावणीसाठी मागणीसाठी यशवंत सेनेच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी, चौंडी (ता. जामखेड, जि. अहमदनगर) येथे 21 दिवसांचे उपोषण केले.
राज्यातील समाजाच्या व्यथा व सद्यस्थितीची बाजू मांडण्यासाठी नियोजनानुसार वेळ मिळावे, अशी विनंती यशवंत सेनेच्या वतीने करण्यात आल्याचे प्रा. दांगडे पाटील यांनी सांगितले. यावेळी यशवंत सेना प्रदेश सरचिटणीस आण्णासाहेब रुपनवर, प्रदेश सचिव नितीन धायगुडे, राष्ट्रीय संघटक गोविंद नरवटे, प्रदेश उपाध्यक्ष समाधान पाटील, पश्चिम महाराष्ट्र संघटक किरण धालपे, यशवंत सेनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.