* विरोधी पक्षांची भूमिका कारखान्याच्या निवडणुकीसाठी महत्त्वाची
* भाजपला जागा मिळण्याची अपेक्षा
* निवडणूक झाल्यास लाखो रुपयांचा फटका
मंचर, लाखणगाव – आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध होणार का, याकडे सर्व ऊस उत्पादकांसह राज्यातील सहकारी साखर कारखान्याचे लक्ष लागले आहे.
साखर कारखान्याचे संस्थापक आणि विद्यमान ग्रहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साखर कारखान्याने राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर विविध पुरस्कार मिळाले आहे. कारखान्याचे कामकाज चांगले असले तरी विरोधी पक्षांची भूमिका कारखान्याच्या निवडणुकीसाठी महत्त्वाची ठरणार आहे. शिवसेनेचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी साखर कारखाना निवडणुकीत सन्मानाने आम्हाला काही जागा दिल्यास आमचे सहकार्य राहील असे सूचक वक्तव्य केले,
तर भाजपचे किसान मोर्चाचे अध्यक्ष संजय थोरात, संपर्कप्रमुख जयसिंगराव एरंडे आणि तालुका अध्यक्ष डॉ. ताराचंद कराळे यांनी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी अशी इच्छा व्यक्त केली आहे; परंतु कारखाना चालकांनी भाजपला काही जागा देऊन आमचा सन्मान करावा अन्यथा आम्हाला पक्षाच्या आदेशानुसार निवडणूक लढवावी लागेल असे स्पष्ट सांगितले आहे.
कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष राजू इनामदार यावेळी म्हणाले की, राज्यात आघाडी धर्म पाळला जातो. मग “भीमाशंकर’च्या निवडणुकीत आघाडीचा धर्म पाळून निवडणूक बिनविरोध करावी. निवडणूक झाल्यास कारखान्याला लाखो रुपयांचा फटका बसेल म्हणजेच ऊस उत्पादकांना निवडणुकीचा भुर्दंड सोसावा लागेल. यासाठी आघाडीचा धर्म पाळून कॉंग्रेसला काही जागा द्याव्यात, असे आवाहन त्यांनी राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला केले आहे.
राष्ट्रवादीचे पाच उमेदवार बिनविरोध
भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे मागील पंचवार्षिक निवडणुकीत 21 जागांपैकी कारखान्याचे संस्थापक दिलीप वळसे पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे पाच उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. दिलीप वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने उर्वरित जागांवर उमेदवार उभे केले होते. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने फक्त 12 उमेदवार उभे केले होते. राष्ट्रवादीने निवडणूक झालेल्या 16 जागा मोठ्या फरकाने जिंकून सर्वच्या सर्व 21 जागा जिंकल्या होत्या.
आढळरावांच्या भूमिकेकडे लक्ष
यावेळी राजकीय परिस्थिती बदलली आहे. एकमेकांच्या विरोधात असलेले शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेस महाविकास आघाडीच्या रूपाने राज्यात सत्तेत आहे. त्यामुळे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आघाडीचा धर्म पाळून निवडणूक बिनविरोध करण्यास सहकार्य करतात, का उमेदवार उभे करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपही कोणती भूमिका घेते याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
शरद बॅंक राष्ट्रवादीकडे, तर भैरवनाथ शिवसेनेकडे
दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ताब्यात असलेली शरद बॅंक व शिवसेनेच्या ताब्यात असलेले भैरवनाथ सहकारी पतसंस्था या ठिकाणी दोन्ही पक्षांना बिनविरोध निवडणुका घेण्यात यश आले आहे.