लोकप्रतिनिधींना ग्रामस्थांचे साकडे ः बांधकाम विभागाने लक्ष देण्याची गरज
खडकवासला – हवेली तालुक्यातील मालखेड ते थोपटेवाडी या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्याच्या कामाला मुहूर्त कधी लागणार, असा सवाल उपस्थित केला जात असून याकडे सार्वजनिक बांधकाम उपविभाग लक्ष देणार का? अशी म्हणण्याची वेळ आली आहे.
सिहगड भागातील हा रस्ता दळणवळणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे. या रस्त्यांची अवकाळी पावसाने बिकट अवस्था झाली आहे. अनेक वेळा या रस्त्याने संबंधित अधिकारी, लोकप्रतिनिधी ये-जा करीत असतांनाही दुरुस्तीकडे डोळेझाक पणा करत आहे. लोकप्रतिनिधी फक्त निवडणूक काळात आश्वासने देतात, तद्नंतर त्यांना विसर पडतो की काय, हा संशोधनाचा विषय आहे.
या रस्त्यावर खड्ड्यांचे मोठ्या प्रमाणात साम्राज्य वाढले आहे. हा रस्ता हा दोन वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतिक्षेत आहे. संबंधित बांधकाम विभागाकडून रस्त्याच्या दुरुस्तीबाबत कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नाही. नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. वाहनचालक, शेतकरी, पादचारी यांना जीव मुठीत धरून मार्ग क्रमन करावे लागत आहे. हा रस्ता वेल्हे तालुक्यात जाण्यासाठी- येण्यासाठी परिसरातील सिंहगड, वेल्हे परिसरातील गावांना शेतीमाल, कामगार वर्गाला जाण्यासाठी जवळचा मार्ग आहे.
आज परिस्थिती पाहता खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा अशी झाली आहे. खड्ड्यांचे प्रमाण वाढल्याने अपघात घडत आहे. वाहने नादुरुस्त होत असून वाहन चालकांना त्याचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. तरी संबंधित विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
-शशिकांत किवळे, कार्याध्यक्ष खडकवासला विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी
या रस्त्यावर दोन ते तीन वर्षांपासून खड्ड्याचे मोठ्या प्रमाणावर साम्राज्य वाढले आहे. त्यामुळे अपघताच्या संख्येत वाढ झाली आहे. तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित दखल घेवून रस्ता लवकरात लवकर दुरुस्ती करावी.
-आनंद देशमाने, वेल्हे तालुका अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी