शेतकऱ्यांसह व्यापारी, उद्योजकांना आशा
योगेश कणसे
लोणी देवकर – केंद्रीय अर्थमंत्री भाजपच्या ज्येष्ठ नेत्या निर्मला सीतारामन या दोनदिवसीय इंदापूर दौऱ्यावर येणार आहेत. दि. 23 आणि 24 रोजी त्या इंदापूर शहर आणि तालुक्यातील विविध ठिकाणी भेटी देणार आहेत. तसेच इंदापूर या ठिकाणी व्यापारी शेतकरी आणि उद्योजकांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे अर्थमंत्री इंदापूरसाठी कोणते गिफ्ट देणार, याविषयी शेतकरी, व्यापारी आणि उद्योजकांसह नागरिकांना आस लागली आहे.
सध्या इंदापूर तालुक्यातील उद्योग व्यवसाय तसेच शेतीपूरक व्यवसाय अडचणीत आहेत. इंदापूरचे अर्थकारण कृषी व्यवसायाशी निगडित आहे. इंदापूरमध्ये असणारी पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील अनेक उद्योग सध्या आजारी आहेत. यामध्ये अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या तसेच भारतीय कंपन्या आहेत. येथील उद्योजकांना अजूनही स्थानिक मूलभूत समस्यांना तोंड द्यावे लागते. अनेक लहान उद्योग जवळपास बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाला आहे.
देशाच्या केंद्रीय अर्थमंत्री इंदापूर दौऱ्यावर येत असल्यामुळे सर्वांनाच याविषयी आस लागली आहे. सध्या लम्पीमुळे पशुपालक कमालीचे अडचणीत आले आहेत. त्यामुळे त्याचा दुग्ध व्यवसायावर थेट परिणाम झाल्याचे चित्र आहे. तर अनेक लहान मोठे व्यवसाय उद्योग आजारी आहेत. त्यामुळे देशाच्या अर्थमंत्री याबाबत कोणता निर्णय घेणार किंवा एखादा दिलासादायक निर्णय घेऊन इंदापूरच्या अर्थकारणाला बळकटी देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अनेक व्यवसाय उद्योगांना सबसिडी तसेच वीज बिलामध्ये काही सवलत, व्यवसायांना सवलतीमध्ये जमिनी, नवीन उद्योग आणि, विस्तारीकरण पाणी आदींसह अन्य बाबींमध्ये व्यवसाय उद्योगांना काही सवलतींची घोषणा वगैरे करणार का याविषयी सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे एकंदरीतच केंद्रीय अर्थमंत्र्यांचा दौरा हा इंदापूरकरांसाठी कोणते गिफ्ट देणार याविषयी नागरिकांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे.
एकंदरीतच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन इंदापूरकरांना कोणते गिफ्ट देणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
केंद्रीय अर्थमंत्र्यांचा तसा हा राजकीय दौरा आहे. केंद्रात भाजप सरकार स्थापन झाल्यापासून अर्थमंत्री पहिल्यांदाच इंदापूरला येत असल्याने त्यांच्याकडून अनेक अपेक्षा आहेत. राजकीय जोडे बाजूला ठेऊन शेतकरी आणि व्यापाऱ्यांना मात्र अर्थमंत्र्यांकडून ठोस निर्णयाची अपेक्षा आहे.
अर्थकारणाचा केंद्र बिंदू
इंदापूर तालुक्यामध्ये तीन सहकारी साखर कारखाने आहेत आणि तालुक्याच्या सीमेवर अनेक खासगी सहकारी साखर कारखाना आहेत. सहकारी साखर कारखान्याच्या धोरणामुळे तालुक्यातील सर्रास शेतकरी आपला ऊस जादा दर मिळण्याच्या अपेक्षेने खासगी साखर कारखान्यांना देतात. जर खासगी साखर कारखान्यांना तेवढा ऊस दर परवडत असेल तर, सहकारी साखर कारखान्यांना का परवडत नाही? त्यामुळे केंद्रीय अर्थमंत्री यांनी सहकार, साखर कारखान्यांना किंवा त्या क्षेत्राला बळकटी मिळेल अशी घोषणा इंदापूर दौऱ्यादरम्यान करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.