पिंपरी, दि. 22 (प्रतिनिधी) -वेदांताने पत्र देऊनही महाविकास आघाडी सरकारने सहा महिन्यात साधी बैठकही घेतली नाही. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नाकर्तेपणामुळे प्रकल्प गुजरातला गेला, असा आरोप ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केला.
शासकीय कार्यक्रमासाठी गिरीश महाजन हे चिंचवडमध्ये आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बोलताना महाजन म्हणाले, 5 जानेवारी रोजी वेदांताने पत्र दिले होते. मात्र सहा महिन्यांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किंवा महाविकास आघाडी सरकारने साधी एक बैठकही घेतली नाही. वायनरीच्या बाबतीत निर्णय घेण्यासाठी सरकार बैठक घेते. शरद पवारही वायनरीच्या बाबतीत आग्रही होते. द्राक्ष शेतीमुळे शेतकऱ्यांना फायदा होईल. पण वेदांताच्या बाबतीत एखादी बैठक घेतली का? कोणाला बोलवलं का? जर सरकारने बैठक घेतली असती, वेदांताला रेड कार्पेट टाकले असते आणि त्यानंतर आमच्या काळात कंपनी गुजरातला गेली असती तर गोष्ट वेगळी होती. त्यामुळे वेदांत गुजरातला गेला याबाबत महाविकास आघाडीला बोलण्याचा अधिकार नाही.
युतीचे सरकार आल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेदांताचे संचालक अग्रवाल यांच्यासोबत बैठक घेतली. मात्र आधीच दोन महिने अगोदरच वेदांता गुजरातला नेण्याचे अग्रवाल यांनी निश्चित केले होते. उद्धव ठाकरे यांनी बैठक घेण्याचे तर सोडा ते साधे घराबाहेरही पडले नाहीत. ते मंत्रालयाची पायरीही चढले नाहीत. ते आमदार, खासदार, मंत्री यांनाही भेटले नाहीत.
महाजन म्हणाले, “गुजरातपेक्षाही जादा गुंतवणूक पुढील अडीच वर्षात महाराष्ट्रात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील हेच सांगितले आहे. महाराष्ट्रासमोर आव्हान तर आहेच. मात्र ते समर्थपणे पेलणारे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे खांदेही आमच्याकडे आहेत. केंद्रातूनही त्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. मात्र महाविकास आघाडीच्या चुकीमुळेच वेदांता गुजरातला गेला आहे.
एका महिन्यात निवडणूक घ्या हे उद्धव ठाकरे यांची मागणी म्हणजे आत्याबाईला मिशा असत्या तर याप्रमाणे आहे. एका महिन्यात निवडणुका घेणे शक्य आहे का? ठाकरे हे अतिशय अस्वस्थ असल्याचे कालच्या मेळाव्यातील भाषणातून दिसले आहे. भडक भाषण करून लोकांना आपले अस्तित्व दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न ठाकरे करीत आहेत, अशी टीका महाजन यांनी केली. महाजन म्हणाले की, ठाकरे यांच्या हातून 40 आमदार आणि 12 खासदार निसटले आहेत. पक्षातील इतर कार्यकर्तेही त्यांना सोडून चालले आहेत. त्यामुळे मोठ्या नेत्यांवर टीका टिप्पणी करून आपले अस्तित्व दाखविण्याची त्यांची ही शेवटची धडपड सुरू आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत उद्धव ठाकरे यांना आपले अस्तित्व कळले आहे. ते शेवटच्या नंबरवर आहेत. त्यामुळे आगामी काळात निवडणुकांनंतर त्यांना कळेल. ठाकरे यांना आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. त्यांनी काहीही बोलल तर त्याचा उलट परिणाम होईल. त्यामुळे त्यांनी संयम ठेवणे हेच योग्य राहील. तसेच दसरा मेळाव्यासाठी त्यांनी दुसरे मैदान शोधावे.