कान्हूर मेसाई येथील बैठकीत शेतकरी, पदाधिकाऱ्यांची एकजूट : आरपारची लढाई लढणार
रांजणगाव गणपती/ पाबळ – ऐन दुष्काळात शिरुर तालुक्याच्या पश्चिम पट्यातील पाणी प्रश्न पेटला असून हा प्रश्न येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीला ही बारा गावे कोणत्या राजकीय नेत्याला व पक्षाला पाणी पाजणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
कान्हूर मेसाईसह परिसरातील बारा गावांसाठी पिण्याचे पाणी तसेच शेतीसाठी पाणी मिळेपर्यंत थांबणार नाही, असा ठाम निर्णय बारा गावांनी घेतला असून पुढील दोन दिवसांत आम्ही धामारी येथे बसून या लढ्यासाठी पुढील निर्णय व रणानिती आखण्याचे काम करणार आहोत. यापुढील काळात गावातील लोकप्रतिनिधींना गावबंदी असून आम्ही आंदोलन करण्याच्या पावित्र्यात आहोत. मुख्यमंत्री किंवा शासनाने आम्हाला शेतीला पाणी द्यावे, नाही मिळाले तर लोकशाही पद्धतीने आंदोलन करून हे पाणी आम्ही आणणारच याच्यावर आम्ही ठाम असल्याचे बारा गावातील सरपंच, उपसरपंच तसेच शेतकरी वर्गाने निर्धार केला आहे.
कान्हूर मेसाई येथील पाणी परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. बारा गावांतील शेतीला पाणी मिळण्यासाठी कान्हूर मेसाई येथील श्री मेसाई देवी मंदिरासमोर नारळाचे तोरण बांधून तसेच रयतेचे राजे श्री छत्रपती महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पाणी परिषदेच्या बैठकीत सुरुवात करण्यात आली.
यावेळी आंबेगाव शिरूर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा अध्यक्ष अमोल जगताप, पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरचिटणीस बबन शिंदे, खैरेनगरचे माजी सरपंच एकनाथ खैरे, सरपंच चंद्रभागा खर्डे, उपसरपंच योगेश पुंडे, हिवरे कुंभारचे सरपंच दीपक खैरे, खैरेनगरचे सरपंच संदीप खैरे, सामाजिक कार्यकर्ते निवृत्ती नानेकर, दादा खर्डे, सोपान पुंडे, सुधीर पुंडे, योगेश पुंडे, भास्कर पुंडे, दीपक तळोले, पाबळ येथील पाणी हक्क परिषदेचे परमेश्वर चौधरी, सरपंच सचिन वाबळे, रघुनाथ शिंदे, सोपान जाधव, अरुण चौधरी, संपत कापरे, प्रमोद पऱ्हाड, परिसरातील आजी- माजी सरपंच, उपसरपंच, चेअरमन, व्हाईस चेअरमन, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याबाबत बारा गावांतील ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, आमचा आवाज सरकारदरबारी पोहोचला नाही तर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. सरकार झोपले आहे का? आता त्यांना जागे करण्याची वेळ आली आहे. पाण्यासाठी कुठल्याही कार्यालयात जाणार असून बारा गावांच्या पाण्यासाठी आंदोलनाचे परिणाम घेताना राळेगणसिद्धी येथील समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांचे दर्शन घेऊन आंदोलनासाठी उतरले आहोत. त्यांनी तुमच्या भागातील पाण्यासाठी तुम्हाला सर्वतोपरी सहकार्य करू, असे आश्वासन देऊन कामास सुरुवात करा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असा आशीर्वाद दिला.
गेली पंचवीस वर्षे हा भाग पाण्यासाठी मागणी करीत असून दुष्काळग्रस्त 12 गावे ही आंबेगाव तालुक्याला जोडली गेल्यानंतर आम्ही आजही दुष्काळी आहोत. गेली 50 वर्षांपासून दुष्काळीच आहोत. पंधरा वर्षांपूर्वी आम्ही आंबेगावला जोडलो नसतो तर कदाचित चासकमान धरणाचे पाणी आम्हाला मिळाले असते. पंधरा वर्षे आम्ही आजही भांडतो आहोत. आंबेगाव तालुका मतदार संघामध्ये समाविष्ट केलेल्या आंबेगाव तालुक्यामध्ये डिंभा धरण आहे. खेड तालुक्यात चासकमान धरण आहे. ज्या मतदार संघात आम्ही आणि ते फक्त मतदानाच्या उद्देशाने जोडलो गेलो..
मागे हटणार नाही
बैठकीत बोलताना पदाधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधी आणि शासनाला निर्वाणीचा इशारा दिला आहे. याबाबत बारा गावांसाठी पाणी मिळाले नाही तर धनंजय पाटलांसारखे न भूतो न भविष्य असे आंदोलन तयार करू आणि त्यात आम्ही कितीही लोक गेली तरी आम्ही मागे हटणार नसल्याचा इशारा या वेळी देण्यात आला.
महसूल शिरूरला, मतदार आंबेगावला
महसुलीने शिरूर तालुका व मतदान आंबेगाव तालुका हा दुजाभाव केला जातो म्हणून या ठिकाणी पाणी मिळत नाही. या राज्य सरकारमध्ये सगळे मंत्रिमंडळ पक्ष एका ताटात जेवू शकतात. एका बैठकीत बसू शकतात तर मग राज्यकर्त्यांनी एकत्र येऊन पाणी कुठूनही मिळाले तरी या भागाला पाणी द्यावे, असे या शेतकऱ्यांच्या वतीने सांगण्यात आले.