ग्रामस्थांच्या मागणीनुसार बहिर्जीचीवाडीत काम पुन्हा सुरू
वाल्हे : पुणे-मिरज-कोल्हापूर या लोहमार्गाच्या विस्तारीकरणाचे काम पुरंदर तालुक्यातील सुरू आहे. तसेच अनेक ठिकाणी या मार्गावर भुयारीमार्ग तयार करण्याचे काम सुरू आहे. या सुरू असलेल्या कामावर ग्रामस्थांनी आक्षेप घेऊन, ते काम बंद पाडले होते. मात्र, ग्रामस्थांच्या मागण्या मान्य करून, रेल्वे प्रशासनाकडून ग्रामस्थांच्या सोयीनुसार मार्ग तयार करण्यास शनिवारी (दि. 6) सुरुवात करण्यात आली असल्याने, शेतकरी, ग्रामस्थ यांच्यापुढे रेल्वे प्रशासनास झुकावे लागले आहे.
बहिर्जीचीवाडी परिसरामधील मुळ रस्त्यावर मागील काही दिवसांपासून, रेल्वे प्रशासनाने भुयारी मार्गाचे काम सुरू केले आहे. मात्र, हा भुयारी मार्ग रेल्वेने येथील पूर्वीच्या रस्त्यावरच सुरू केल्याने हा वेडावाकडा वळणाचा भुयारी मार्ग धोका निर्माण करणारा होणार असल्याचे ग्रामस्थांना निदर्शनास येऊ लागल्यान तसेच या भुयारीमार्गामध्ये पाणी साठल्यास लोकांच्या येण्या-जाण्याचा मोठा प्रश्न निर्माण होईल, तसेच येथील शेतकरी वर्गासह कामगार वर्गाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल, असा स्थानिकांचा आक्षेप आहे.
यावेळी, वाल्हे जवळील वागदरवाडी- बहिर्जीचीवाडी, पवारवाडी, मोरूजीचीवाडी, बाळाजीचीवाडी आदी वाड्यावस्त्यांवर जाण्यासाठी तयार होत असलेल्या भुयारीमार्गाचे काम शुक्रवारी परिसरातील ग्रामस्थांनी एकत्र येऊन बंद पाडले होते. यावेळी, कामाच्या पाहणीसाठी आलेले रेल्वे प्रशासनाचे विजयकुमार सक्सेना यांच्याकडून समाधानकारक उत्तरे देता न आल्याने हे काम बंद ठेवण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला होता.
याप्रसंगी, रेखाताई पवार, उद्योजक सुनील पवार, पोपट पवार, राजसिंह पवार, अरविंद पवार, विजय पवार, तात्यासाहेब पवार, बाळासाहेब पवार, नारायण पवार, शिवाजी पवार, कैलास पवार, महेंद्र पवार आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान, रेल्वे प्रशासनाचे विजयकुमार सक्सेना यांना ग्रामस्थांनी त्यांच्या विविध समस्यांच्या तक्रारीचा पाढा त्यांच्यासमोर मांडला. दरम्यान, सक्सेना यांच्याकडून समाधानकारक उत्तरे न आल्याने ग्रामस्थांनी काम बंद ठेवण्याचा पवित्रा घेतला. अखेर सक्सेना यांनी काम बंद ठेवण्याबाबत ग्रामस्थांकडून लेखी मागणीपत्र घेऊन याबाबत, वरिष्ठांशी संपर्क साधून यावर पर्याय काढण्याचे आश्वासन दिले होते.
ग्रामस्थांचा विजय
पुणे-मिरज लोहमार्गावर अनेक ठिकाणी रेल्वे प्रशासनाने भुयारी मार्ग केले आहेत. जर इतर ठिकाणी थोडा का होईना रस्ता सरळ असू शकतो; तर आमच्या येथे का नाही, असा प्रश्न उपस्थित करत, शासन जनतेच्या पैशावर ही कामे राबवीत असते. त्यामुळे जनतेच्या पैशातून होणारी कामे जनतेला हवी तशीच व्हायला हवी, असा आग्रह ग्रामस्थांनीच्या एकजुटीने धरला होता. या एकजुटीपुढे रेल्वे प्रशासनास झुकावे लागल्याने शेतकऱ्यांसह ग्रामस्थ, प्रवाशी वर्गाचा या मार्गातून पुढील प्रवास सुकर होणार असल्याचे मत यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केले.