दिवे (वार्ताहर)- पुरंदर वासियांच्या जिव्हाळ्याचा “गुंजवणी’ प्रकल्प मध्यतरी राजकारण आणि न्यायालयाच्या फेऱ्यात अडकल्याने रेंगाळाला होता. थेट धरणापासून शेतात बंद जलवाहिनीद्वारे पाणी देणारा तथा देशातील पहिलावहिला बंद पाइपलाइन प्रकल्पाच्या कामास सुरुवात झाल्याने तो लवकरात लवकर पूर्ण होईल, असा विश्वास माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी व्यक्त केला.
गुंजवणी प्रकल्प हा विजय शिवतारे यांचा ड्रीम प्रोजेक्ट मानला जातो. जवळपास एक हजार सहा कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात येणाऱ्या प्रकल्पामधील पहिल्या टप्प्यात 83 किमीपर्यंत काम करण्यात येणार आहे.
पुणे पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता प्रवीण कोल्हे म्हणाले की, सध्या पाइपला सिमेंटचे अस्तरीकरण सुरू आहे. ते संपले की लगेचग जलवाहिनी टाकण्याचे काम सुरु होईल. गुंजवणी प्रकल्प केंद्र सरकारच्या पीआयएन (पाइप्ड इरिगेशन नेटवर्क) या धोरणानुसार साकारण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी 1313 कोटी रुपये खर्च करण्यास राज्य शासनाची यापूर्वीच मंजूरी मिळाली आहे. 4.17 टीएमसी पाणी क्षमता असलेल्या गुंजवणी प्रकल्पाद्वारे भोर, वेल्हे, पुरंदर या तीन तालुक्यांमधील क्षेत्राला पाणी मिळणार आहे. वर्षभर शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत 24 तास आणि 365 दिवस विजेशिवाय पाणी मिळणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान हरित लवाद, जलसंपत्ती नियमन प्राधिकरण येथील खटल्यांमुळे जवळपास तीन वर्ष प्रकल्प रखडला गेला. पुढे उच्च न्यायालयातही दोन याचिका करण्यात आल्या; परंतु यामागे विजय शिवतारे यांच्या विरोधकांचा यात हात होता असे म्हटले जाते. या सर्व खोडसाळ याचिकांना सर्व न्यायालयांनी केराची टोपली दाखवली आणि प्रकल्पाच्या बाजूने निकाल दिला असून तो आता लवकरच मार्गी लागेल असे, शिवतारे यांनी नमूद केले.
“त्या’ खोऱ्यातही मिळणार पाणी
वांगणी, वाजेघर आणि शिवगंगा खोऱ्याला पाणी देण्याची बाब माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी प्रस्तावित केली होती. त्यास मंजुरी मिळणार असून त्यामुळे प्रकल्पाचे कार्यक्षेत्र देखील विस्तारणार आहे.