मानसिंग रुपनवर, मनोज खंडाळे
केडगाव/ वरवंड – जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा शुक्रवारी (दि.16) वरवंड येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या प्रांगणात विसावला. पावणेसहाच्या सुमारास पालखी वरवंड येथे पोहोचली. यावेळी वरवंडकरांकडून फुलांची मुक्त उधळण व फटाक्याची आतषबाजी करीत मोठ्या जल्लोषात पालखीचे स्वागत करण्यात आले.
सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास यवत येथून पालखीने प्रस्थान ठेवत ग्रामप्रदक्षिणा घातल्यानंतर ग्रामदैवत काळभैरवनाथ मंदिरातील मुक्कामानंतर पालखी सोहळा हा पुढील वरवंड येथील मुक्कामाकडे मार्गस्थ झाला. यवत येथील ग्रामपंचायत प्रशासन, शासकीय कर्मचारी, अधिकारी, पोलीस प्रशासन आणि यवत ग्रामस्थांनी व भाविकांनी पालखी सोहळ्याबरोबर भांडगावपर्यंत पायी वाटचाल केली.
भांडगाव येथे सकाळी दहाच्या सुमारास दिवसाचा पहिला विसावा घेण्याकरिता पालखी सोहळा विठ्ठल मंदिरात थांबवला.प्रथेप्रमाणे पादुका पूजन व आरती स्थानिकांच्या हस्ते करण्यात आली. दुपारच्या भोजनासाठी परंपरेप्रमाणे पिठलं- भाकरीची सोय करण्यात आली होती.
दुपारी 1 वाजता पालखीने पुढील मुक्कामाच्या वरवंडच्या दिशेने प्रस्थान ठेवले. दुसऱ्या विसाव्यासाठी पालखी चौफुला येथे थांबली. तहसीलदार शेलार, गटविकास अधिकारी अजिंक्य येळे, उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल जाधव, यवत पोलीस ठाण्याचे निरीक्षक हेमंत शेडगे, वरवंड गावचे सरपंच मीनाक्षी दिवेकर, उपसरपंच बाळासाहेब जगताप, ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी व कार्यकर्ते संख्येने उपस्थित होते.
चौफुला चौकात जयघोष
केडगाव- चौफुल्याकडे मार्गस्थ झालेल्या वारकरी बंधूसाठी न्यू अंबिका कला केंद्राच्या कलाकारांनी लावणी आणि जेवणाची मेजवानी दिली. मागील 27 वर्षांपासून ही परंपरा जपली आहे, अशी माहिती व्यवस्थापक अशोक जाधव यांनी दिली. दोन तास सोहळा विसावल्यानंतर केडगाव, दापोडी, वाखारी, आंबेगाव, नानगाव, पारगाव, कडेठाण, खुटबाव आदी गावांतून भाविक दर्शनासाठी आले होते.