वालचंदनगर- सध्या साखर कारखाने सुरु झाले असून रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात ऊस वाहतूक होत आहे; मात्र वाहतूक नियमांची पायमल्ली करून नियम धाब्यावर बसवत धोकादायक पद्धतीने सर्रास ही ऊस वाहतूक केली जात आहे.
इंदापूर तालुक्यात तीन सहकारी साखर कारखाने असून लगतच्या तालुक्यांमधील सहकारी व खासगी साखर कारखान्यांना देखील इंदापूर तालुक्यातून ऊस वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते. सध्या इंदापूर तालुक्यातून अनेक साखर कारखान्यांना होत असलेली ऊस वाहतूक ही ट्रॅक्टर ट्रॉलीमधून होत आहे; मात्र वाहनाची वाहतूक क्षमता लक्षात न घेता, अपघाताबाबतची कोणतीही काळजी न घेता अधिकच्या क्षमतेने, धोकादायक पद्धतीने ऊस वाहतूक केली जात असल्याचे चित्र दिसत आहे.
काही वेळी साखर कारखाने व वाहतूक नियमानुसार ट्रॉलीच्या मागील बाजूस लाल रंगाचे कापड लावून नियम पाळत असल्याचे भासवले जाते. तर अनेक ट्रॅक्टर ट्रॉलीला रिफ्लेक्टरच बसवलेले दिसत नाहीत. दुसरीकडे याच वाहनांमधून क्षमतेपेक्षा जास्त ऊस भरून धोकादायक स्थितीत वाहतूक केली जात आहे.
जीव मुठीत धरून प्रवास
काही ट्रॅक्टरचालक मोठ्या आवाजात गाणी लावून बेदरकारपणे ट्रॅक्टर चालवत असतात. यामुळे मागून येणार्या गाड्यांचा अंदाजच या चालकांना नसतो; मात्र त्यांच्या या बेदरकारपणामुळे मागून येणार्या वाहन चालकांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.