नगरपरिषदेने बंदोबस्त करावा : हतबल नागरिकांची मागणी
चाकण – चाकण शहरातील लहान मुलं आणि त्यांचे पालक आणि सामान्य नागरिकांना सध्या झुंडीने भटकणार्या मोकाट कुत्र्यांची दहशत आहे. कारण गेल्या काही महिन्यापासून काही मोकाट पिसाळलेल्या कुत्र्यांनी अनेकांना चावा घेतलाय. नगरपरिषद प्रशासन मात्र काहीच पावलं उचलताना दिसत नसल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. कुत्र्याने लचके तोडल्याने अनेकांना थेट रुग्णालय गाठण्याची वेळ आली आहे. नगरपरिषद प्रशासनाकडे अशी भटकी कुत्री पकडण्यासाठी कोणतीही यंत्रणाच उपलब्ध नसल्याने तेही हतबल झाले आहेत.
चाकण शहराच्या सरकारी तसेच खासगी रुग्णालयात लहान मुलांना उपचारासाठी दाखल करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याला कारण ठरलंय मोकाट, भटकी आणि पिसाळलेल्या कुत्र्यांचा सुळसुळाट. शहरातील सर्वच भागात मोकाट कुत्र्यांनी लहान मोठे असे सर्वानाच चावे घेतले आहेत. एकावेळी चार ते पाच जणांना कुत्रे चावतात आणि प्रशासन यावर काहीच करत नाही असा नागरिकांचा आरोप आहे. आता या भटक्या व मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी नगरपरिषद प्रशासन कोणती उपाययोजना राबविणार असल्याचा सवाल नागरिकांनी विचारला आहे.
शहरातील मोकाट कुत्र्यांच्या संख्येला आवर घालण्यासाठी श्वान निर्बिजीकरण सारखी यंत्रणा आजवर या भागात कधीही राबविली गेली नाही. त्यामुळे कुत्र्यांची संख्या मात्र वाढतच चाललीय. शिवाय लगतच्या महापालिका भागातून मोकाट कुत्री या भागात सोडण्यात येत असल्याचा नागरिकांचा कयास आहे. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त कुणी करायचा, असा यक्ष प्रश्न नागरिकांसमोर उभा आहे. अशी चावा घेणारी मोकाट कुत्री विद्यार्थ्यांना चावल्याने त्यांच्या शैक्षणिक नुकसानाची जबादारी कोण घेणार असा सवाल येथील नागरिकांनी उपस्थित केला आहे.
नगरपरिषदेकडे भटक्या, मोकाट कुत्र्यांबाबत नागरिकांकडून तक्रारी दाखल झाल्या आहेत.नगरपरिषदेकडून भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण यंत्रणा राबविण्यात येणार आहे. या संदर्भात जाहीर निविदा प्रसिद्ध करण्यात येऊन लवकरच त्याबाबत काम करण्याचे ठरले असून प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात येणार आहे.
-सुनील बल्लाळ, मुख्याधिकारी चाकण नगरपरिषद