सासवड – पुरंदर तालुक्यामध्ये तीव्र दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या असून सर्वत्र चारा, पाण्याची तीव्रटंचाई निर्माण झाली आहे. पिके जळाली आहेत, विहिरी कोरड्या पडल्या आहेत, अशा परिस्थितीत शेतकरी हवालदिल झाला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय पथकाने प्रातिनिधिक स्वरुपात तालुक्यातील शिवरी, तक्रारवाडी, साकुर्डे, नाझरे धरण या दुष्काळी भागाची पाहणी केली.
यावेळी या पथकामध्ये केंद्रीय अन्न व प्रशासन विभागाच्या अधिकारी सरोजिनी रावत, केंद्रीय पेयजल व स्वच्छता विभाग अतिरिक्त सल्लागार ए. मुरलीधरण यांचा समावेश होता तर त्यांच्या समवेत उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे, तहसीलदार विक्रम राजपूत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे, तालुका कृषी अधिकारी सुरज जाधव, गटविकास अधिकारी डॉ. अमिता पवार, नायब तहसीलदार मिलिंद घाडगे, मंडल अधिकारी दुर्गादास शेळकंदे, तलाठी प्रकाश राठोड, सोमशंकर बनसोडे, सरपंच प्रमोद जगताप यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
यावेळी हवालदिल शेतकर्यांनी यावर्षी पावसाळ्यामध्ये आमच्या परिसरात एकही मोठा पाऊस झाला नाही तर काही भागात हलक्या पावसाच्या सरी झाल्या असल्याचे सांगत खरीप अथवा रब्बी हंगामात कोणतीही पिके आली नाहीत. फळबागांसह ज्वारीचे पीक जळू लागले आहे. सध्या या भागात पाण्याची पातळी खूप खोलवर गेली असून विहिरी, बोरवेल, पाझर तलाव कोरडे ठणठणीत पडले आहेत. माणसांप्रमाणेच जनावरांनाही चारापाण्याची तीव्रटंचाई जाणवत आहे.
तरी या भागांमध्ये तातडीने चारापाण्याची व्यवस्था होणे गरजेचे आहे. तसेच शेतकर्यांना पिकांची नुकसानभरपाई मिळणेही गरजेचे असल्याचे सरपंच प्रमोद जगताप, संजय कामथे, विकास कामथे, नवनाथ गायकवाड, राजाभाऊ क्षीरसागर, महादेव कामथे, अनंता लिंभोरे, उदय गायकवाड, भाऊसाहेब कामथे, तुकाराम कांबळे, अंकुश कामथे, रामदास कामथे यांच्यासह शेतकर्यांनी सांगितले.
जलयुक्त शिवाराची कामे झाले की नाही
या पथकाने येथे जळालेल्या ज्वारी पिकाची पाहणी केली तर पाझर तलावांमध्येच कोरड्या पडलेल्या विहिरीची पाहणी करून पर्जन्यमान कमी व पाण्याची पातळी खोलवर गेल्याने अडचणीत असलेल्या शेतकर्यांना सध्या पाण्याची काय व्यवस्था आहे, जनावरांना चारा कुठून आणता, एकरी किती प्रमाणामध्ये आपले नुकसान झाले आहे, पाण्याची पातळी किती खोल आहे, विहिरी, बोअरवेलचे प्रमाण किती, पिण्याचे पाणी किती दिवसाने मिळते, त्याची साठवणूक कशी करता तर प्रशासनाच्या वतीने या भागांमध्ये जर उपाययोजना करायच्या म्हटल्या तर त्या कशा कराव्या लागतील या सर्व बाबत माहिती जाणून घेतली. तर या भागामध्ये जलयुक्त शिवाराची कामे झाले की नाही असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.