मंचर येथील श्री साईनाथ नागरी सहकारी संस्थेत नाराजी
मंचर – श्री साईनाथ नागरी सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. मात्र संचालक मंडळात संस्थेचे संस्थापक आणि गेली 25 वर्षे संस्थेचा पारदर्शक कारभार पाहणारे विद्यमान अध्यक्ष गिरीश समदडिया हे नूतन मंडळात संचालक नसल्याने नाराज होऊन 11 पैकी 7 संचालकांनी दोनच दिवसांत राजीनामे दिले आहेत.
श्री साईनाथ सहकारी पतसंस्थेची 2022-27 साठी संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच झाली. या निवणुकीत माघारीच्या दिवशी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गिरीश समदडिया यांनी माघार घेतली. संस्थेचा कारभार पारदर्शक आहे. अध्यक्ष गिरीश समदडिया, व्यवस्थापक दिलीप शर्मा यांच्यावर सभासद, कर्जदार, ठेवीदारांनी गेली 25 वर्षे विश्वास ठेवल्याने संस्था स्थापन झाल्यापासून एकदाही पतसंस्थेची निवडणूक लागली नाही; मात्र ज्या सभासदांचा पतसंस्थेशी कोणता आर्थिक व्यवहार नाही व संस्था वाढीसाठी कोणतेही प्रयत्न केले नाही अशा ठराविक सभासदांनी जाणूनबुजून निवडणूक लावली, त्यामुळे संस्थेचे संस्थापक गिरीश समदडिया यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने सभासद, ठेवीदार, कर्जदार यांच्यामध्ये नाराजी निर्माण झाली.
त्यामुळे संजय चव्हाण, सुदाम काळे, सगाजी पाटील, नंदकुमार पडवळ, राजेंद्र थोरात, नीलम पोखरकर, मीर यावरआली मुरादआली या सात संचालकांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेऊन संबंधितांनी सहायक निबंधक कार्यालय मंचर यांच्याकडे राजीनामे लेखी स्वरूपात पाठविले आहेत. याबाबत सहायक निबंधक मंचर हे काय निर्णय घेतात, याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे.
संबंधित संचालकांचे राजीनामे प्राप्त झाले असून, पुणे येथील वरिष्ठ कार्यालयाला राजीनामे पाठविले आहेत. संबंधितांच्या मार्गदर्शनानुसार पुढील कार्यवाही केली जाईल.
– पी. आर. रोकडे, सहायक निबंधक