मंचर -सातगाव पठार (ता. आंबेगाव) भागात झालेल्या पावसामुळे बटाटा उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी बटाटा उत्पादक शेतकऱ्यांनी काढलेल्या बटाट्याची अग्रक्रमाने खरेदी करावी, अशी मागणी आंबेगाव-शिरूर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर पाटील व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी रांजणगाव येथील संबंधित कंपन्यांच्या व्यवस्थापनाकडे केली. त्यानुसार दररोज 500 टन बटाटा प्रतवारीनुसार योग्य दराने खरेदी करणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सातगाव पठार आणि परिसरातील शेतकऱ्यांच्या बटाटा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या बटाटा पिकांची पाहणी मंत्री दिलीप वळसे पाटील याच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केली.
मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश दिल्याने प्रशासनाने पंचनामे सुरू केले आहेत. शेतकऱ्यांनी भर पावसात काढलेला बटाटा लवकर खराब होत असल्याने नुकसान टाळण्यासाठी बटाटा कंपनीमध्ये नेऊन त्यावर प्रक्रिया करून खाद्यपदार्थ बनविले जावेत, यासाठी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, आंबेगाव-शिरूर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर यांनी रांजणगाव एमआयडीसी येथील कंपनीमध्ये संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेतली. शेतकऱ्यांचा माल प्रक्रियेसाठी जास्तीत जास्त घेतला जावा, याबाबत चर्चा केली. चर्चेअंती कंपन्यांनी दररोज 500 टन बटाट्यावर प्रक्रिया करण्याबाबतचे आश्वासन दिले आहे.