नवी दिल्ली – चेन्नई सुपर किंग्जचा स्टार खेळाडू सुरेश रैना संघात पुनरागमन करणार, अशा चर्चांना उधाण आले होते. मात्र, संघ व्यवस्थापनाचे सदस्य काशी विश्वनाथ यांच्यासह आता खुद्द रैनानेच अशी कोणतीही शक्यता नसल्याचे सांगत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
यंदा अमिरातीत होत असलेल्या आयपीएल स्पर्धेत चेन्नई संघाला गेल्या दोन्ही सामन्यांत अपयशाचा सामना करावा लागला होता. त्यातच फाफ डुप्लेसी वगळता अन्य एकाही फलंदाजाला दर्जाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे रैना पुनरागमन करणार अशी चर्चा जोर धरत होती. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच रैना स्पर्धेतून माघार घेत मायदेशी परतला होता व त्यानेच पुन्हा अमिरातीत जाऊ शकतो असे संकेत दिले होते. मात्र, आता त्यावर रैनानेच स्पष्टीकरण दिल्याने ही चर्चा संपली आहे.
चेन्नई संघाच्या कामगिरीवर बोलताना कर्णधार महेंद्रसिंग धोनीनेही रैनाची उणीव जाणवल्याचे मत व्यक्त केल्यामुळेच रैनाच्या पुनरागमनाची शक्यता वाढली होती. तसेच त्याने पुन्हा संघासाठी माघारीचा निर्णय मागे घेत स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहनही सोशल मीडियावर अनेकांनी केले होते. त्यावर विश्वनाथ यांनी अशी कोणतीही शक्यता नसल्याचे सांगितले होते. त्यानंतरही ही चर्चा सुरूच राहिल्याने अखेर रैनालाच याचा खुलासा करावा लागला आहे.
या स्पर्धेच्या इतिहासात केवळ चेन्नई संघाचाच नाही तर संपूर्ण स्पर्धेतील सर्वात यशस्वी खेळाडू असा रैनाचा उल्लेख होतो. त्याने आयपीएलचे 193 सामने खेळताना 5 हजार 356 धावा केल्या आहेत. त्यात त्याने 1 शतक व 38 अर्धशतके फटकावली आहेत. रैनाच्या आक्रमक फलंदाजीची देखील या स्पर्धेत सर्वाधिक चर्चा झाली आहे. त्याने तब्बल 28 वेळा नाबाद खेळी केल्या आहेत. तसेच 493 चौकार व 194 षटकारांचीही आतषबाजी केली आहे.
विक्रमावरही पाणी सोडले
रैनाला या स्पर्धेत 500 चौकार व 200 षटकारांचा पल्ला गाठण्याची संधी होती. तसेच आयपीएलचे 200 सामने खेळण्याची कामगिरी देखील त्याच्या नावावर नोंदली गेली असती. मात्र, त्याने माघार घेतल्याने ही संधी त्याला आता पुढील स्पर्धेत मिळण्याची शक्यता आहे.