मंचर – आदिवासी भागात असलेल्या डोण (ता. आंबेगाव) येथे शेतकऱ्यांनी भात पीक लागवडीसाठी तयार केलेली भात रोपांची रानगव्यांनी नुकसान केले असून, याबाबत वनविभागाने पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
डोण येथे गेल्या काही दिवसांपासून चार ते पाच रानगव्यांचा कळप आला असून त्यांनी येथील शेतकरी चिंतामण तुळा गवारी यांनी भातपीक लागवडीसाठी शेतात तयार केलेल्या रोपांची नुकसान केले आहे.
येथील शेतकरी रामा होना गवारी, देवजी तुकाराम गवारी, चिंतामण तुळा गवारी, सुनील हिरामण गवारी, नामदेव महादू गवारी, सखाराम भिका गवारी, कृष्णा महादू गवारी या शेतकऱ्यांच्या भातरोपांचे नुकसान करून मोठे नुकसान झाले आहे. आदिवासी भागातील शेतकऱ्यांचे भात हे महत्त्वाचे पीक असून कुटुंबाची उपजीविका ही याच पिकावर अवलंबून आहे.
रानगव्यांनी भातरोपांचे नुकसान केल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे, त्यामुळे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून शेतकऱ्यांना मदत मिळवून द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे. दरम्यान याबाबत शेतकरी चिंतामण गवारी यांनी घोडेगाव वनविभागाच्या कार्यालयात पत्रव्यवहार केला असल्याचे त्यांनी सागितले.