राजगुरूनगर – भोमाळे (ता. खेड) येथे स्मशान भूमी नसल्याने पावसात उघड्यावर अंत्यसंस्कार करावे लागतात अंत्यसंस्कार करताना डिझेल टाकून भर पावसात सरण पेटवावे लागत आहेत. यासाठी ग्रामस्थ नातेवाइकांना मोठी कसरत कारवी लागते शिवाय स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे.
भोमाळे गावात स्मशान भूमी आहे. गावातील शेतकऱ्यांनी गावाच्या स्मशान भूमीसाठी 3 गुंठे जागा दिली आहे. सातबारा त्याची नोंदणी झाली आहे. स्मशान भूमीसाठी निधी सरकार देते; मात्र गावातीलच एका शेतकऱ्याचा विरोध असल्याने स्मशानभूमी बांधण्यास अडचण येत आहे. संबंधित शेतकऱ्याला गावातील ग्रामस्थांनी, राजकीय व्यक्तींनी ज्येष्ठ ग्रामस्थानी विनंत्या करूनही त्याचा कायम विरोध आहे.
तहसीलदार, प्रांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्याकडे याबाबत ग्रामस्थांनी दाद मागितली आहे; मात्र त्यावरही मार्ग निघत नसल्याने ग्रामस्थांची मोठी पंचाईत होत आहे. एक शेतकरी अख्या गावाला वेठीस धरत आहे. त्यामुळे गावातील व्यक्ती मयत झाल्यास त्यास उघड्यावर जाळण्याची वेळ ग्रामस्थांवर आहे.
दरम्यान, धोधो पावसात सरण पेटवण्याचा संघर्ष कधी थांबणार याबाबत सोमवारी (दि. 18) एका अत्यंस्काराप्रसंगी या स्मशानात पुन्हा कुजबुज होती. अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालावे आणि गावातील ग्रामस्थांचा हा सघर्ष थांबवावा अशी मागणी नातेवाईक भोमाळे ग्रामस्थानी केली आहे.
गावात दोन गट
स्मशानभूमीवरून गावात दोन गट पडले आहेत. ग्रामसभेत अनेकदा याबाबत चर्चा झाल्या आहेत. स्मशान भूमी बांधण्यासाठी निधी येतो; मात्र बांधकामाच्या वेळी संबंधित शेतकरी हरकत घेत असल्याने हे काम मार्गी लागत नाही तर दुसरीकडे पर्यायी जागा उपलब्ध नसल्याने हा प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित राहिला आहे.