उन्हाच्या तीव्रतेने प्रवासी संख्या कमालीची घटली
वाल्हे – मार्च महिन्यातील दुसर्या आठवड्यापासून उन्हाची ञीव्रता जाणवू लागली होती. तसेच महिन्यांच्या शेवटच्या आठवड्यात उन्हाची तीव्रता अधिक वाढल्याने दररोज मोठी वर्दळ असलेला आळंदी-पंढरपूर पालखी महामार्ग दुपारी ओस पडला आहे.
चौथा शनिवार सुट्टी दिवस, रविवारी हिंदू धर्मातील वर्षातील शेवटचा सण होळी, सोमवारी धूलिवंदन या सलग तीन दिवस सुट्या असल्याने नेहमीप्रमाणे पालखी महामार्गावर वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढेल असे अपेक्षित असतानाही सणाच्या आदल्या दिवशी प्रवासी दुपारी घराबाहेर न पडल्याने वाल्हे येथील पालखी महामार्ग ओस पडलेला दिलासला. उन्हाच्या तीव्र झळांमुळे मार्च महिन्यांतच प्रवाशी हैराण झाले आहेत. पुढील आठवड्यात तापमान 40 अंशांपर्यंत वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
कमाल तापना 36 अंश सेल्सिअस
पालखी महामार्गावर ठिकठिकाणी थंड पेयांच्या गाड्यांची संख्या वाढल्याचे चित्र आहे. वाढत्या उन्हामुळे प्रवाशांच्या संख्येतही घट झाल्याचे दिसून येत आहे. मागील काही दिवस ढगाळ वातावरण होते. आता हे वातावरण निवळले आहे. शुक्रवारी कमाल तापमान 36 अंश होते. तर किमान तापमान 22 अंश नोंदले गेले. दरम्यान, पुढील चार दिवस कमाल तापमान 3 ते 4 अंश सेल्सीअसपर्यंत वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.