वाल्हे, (वार्ताहर) – पुरंदर तालुक्यात झेंडेवाडी ते पिसुर्टी फाटा दरम्यान आळंदी ते पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम गतीने सुरू असून हा मार्ग विकसित होत असल्याने पुरंदर तालुक्याच्या सर्वांगीण विकासाला मोठी गती मिळणार आहे.
या महामार्गाच्या कामाला राज्य शासनाच्या वतीने सुरुवात करण्यात आली होती; मात्र, शेतकर्यांना विश्वासात न घेता हे काम सुरू केल्याने काही दिवसांत हे काम बंद झाले होते. यानंतर या रस्त्याचे हस्तांतरण राष्ट्रीय महामार्गकडे करण्यात आले व त्यांच्या वतीने सध्या हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग म्हणून विकसित करण्यात येत आहे.
पालखी महामार्गाचे काम होत असताना पुरंदर तालुक्यातील झेंडेवाडी, काळेवाडी, ढुमेवाडी, दिवे, पवारवाडी, सासवड, खळद, वाळुंज, शिवरी, निळुंज, तक्रारवाडी, साकुर्डे, बेलसर, जेजुरी, कोळविहिरे, दौंडज, वाल्हे, पिसुर्टी, जेऊर, पिंपरे, नीरासह अन्य गावांच्या लगत हा महामार्ग जात असल्याने या भागातील शेतजमिनींना मोठी मागणी होऊ लागली आहे. तर सध्या पालखी महामार्गाचे भूसंपादन होत असताना या प्रक्रियेत असणार्या 18 गावांच्या पैकी जवळपास सर्वच गावांना भूसंपादनाचे पैसेही मिळत आहेत.
पर्यटनाला मिळणार गती
पुरंदर तालुक्यामध्ये महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीचा खंडोबा, श्रीक्षेत्र भुलेश्वर, श्रीक्षेत्र वीर, नारायणपूर, केतकावळे (प्रति बालाजी), वाल्हे येथील आद्यरामायणकार महर्षि वाल्मिकी समाधी मंदिर, शिवरी यमाई देवी, हरणी येथील हरणेश्वर, बोपगाव येथील कानिफनाथ, कोडीत, पिंगोरी येथील वाघेश्वरी मंदिर आदी तीर्थस्थळे तसेच,
पुरंदर किल्ला, मल्हार गड आदी पर्यटन स्थळे असून या पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी राज्याच्या कानाकोपर्यातून भाविक, पर्यटक येत असतात. या महामार्गामुळे त्यांच्यासाठी हा प्रवास अतिशय आल्हाददायक होणार असल्याने पर्यटकांच्या संख्येत निश्चितपणे वाढ होईल व त्यामुळे स्थानिक भागातील उद्योग व्यवसायांना याचा फायदाही होईल.
पीएमपीएमएल सेवा सुरू होण्याची आशा
पालखी महामार्गाचे काम नीरा शहरापर्यंत पूर्ण झाल्यानंतर पीएमपीएमएल बससेवा पुन्हा नीरा शहरापर्यंत सुरू होईल, अशी आशा येथील प्रवाशीवर्गाला आहे. या भागात पीएमपीएमएलची बस सेवा ही जेजुरी औद्योगिक वसाहतीपर्यंत सुरू आहे. या भागातील नागरिकांना हा प्रवास अतिशय सुखद व आल्हाददायक झाला आहे. प्रवाशांची वर्दळ दिवसेंदिवस वाढत आहे.
तसेच जेजुरी औद्योगिक वसाहतीपर्यत सद्या सुरू असलेली ही सेवा पुढे वाल्हे मार्गे नीरेपर्यंत सुरू करण्याबाबतची मागणी होत असून ही बससेवा सुरू झाली तर प्रवशांसह बळीराजाला मोठा दिलासा मिळणार आहे.