मतदानापासून वंचित ठेवण्याचे कारस्थान : आमदारांसह 32 हजार जणांना नोटीसा
सासवड – पुरंदर तालुक्यातील 32 हजार मतदार हे सांगली जिल्ह्यातील असल्याचा आरोप करून मुख्यमंत्र्यांच्या ओळखीचा दुरूपयोग करून, प्रशासनाला हाताला धरून माजी आमदार विजय शिवतारे यांच्या तक्रारीवरून तहसीलदारांनी आमदार संजय जगताप यांसह पुरंदर तालुक्यात पिढ्यान्पिढ्या वास्तव्यास असणार्या अनेक गावच्या आजी-माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांसह 32 हजारांपेक्षा अधिक नागरिकांना नोटीसा बजावल्या आहेत.
गुरूवारी (दि. 4) सासवड येथील नवीन प्रशासकीय कार्यालयात हजारो नागरीकांचा आक्रोश दिसला. शिवतारेंबाबत अनेकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. शिवतारे आणि शासनाच्या भोंगळ कारभाराविरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी, आधी हरकत घेणार्या विजय शिवतारेंना येथे उपस्थित करा मग सुनावणीला सुरूवात करा, सुनावणीला आलेल्या सर्व नागरीकांच्या चहापानाची व्यवस्था करा, त्यांना दिवसाची रोजंदारी द्या अशा मागण्या यावेळी आमदार संजय जगताप यांनी करीत प्रशासनाच्या चुकिच्या कामकाजाचा निषेध व्यक्त केला. सर्वसामान्य नागरिकांबरोबर लोकप्रतिनिधी असणार्या मला तसेच अनेक आजी माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांना याबरोबरच काही पत्रकारांनाही नोटीस आल्या आहेत. हरकत घेणारा काय सरकारचा जावई आहे का, असा प्रश्न उपस्थित करीत आमदार संजय जगताप यांनी, सर्वसामान्य नागरिकांना मतदानापासून वंचित ठेऊन लोकशाही आणि संविधानाचा खून करण्याचे कारस्थान असल्याचा आरोप केला.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी आमदार संजय जगताप यांनी तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदार विक्रम रजपूत यांना दि. 4 जानेवारी सुनावणीवेळी शासनाने नागरिकांची सर्व व्यवस्था करण्याची मागणी केली होती. मात्र प्रत्यक्षात सुनावणी दिवशी मात्र नागरीकांची कोणतीही सोय न करता तीन वेळा ठिकाणे बदलून जेष्ठ नागरिक, दिव्यांग बांधव आणि सर्वसामान्यांची गैरसोय केली. हवेलीतील भागात अतिक्रमणाच्या नोटीस बजावून नागरीकांना रोखण्याचा प्रयत्न केला, असेही नागरीक म्हणाले.
मुंबईत मंगळवारी उपोषण
सर्वसामान्य नागरिकांना वेठिस धरणार्या प्रशासनाला जाब विचारणार असून त्यांना आदेश देणार्या मुख्य निवडणूक आयुक्तांना आणि मुख्यमंत्र्यांना याचा जाब विचारण्यासाठ मंगळवारी (दि. 9) मुंबई येथे उपोषण करणार असल्याचे आमदार संजय जगताप म्हणाले. माहूरच्या माजी ग्रामपंचायत सदस्या मंजुषा गोळे यांचे नावच आजच्या सुनावणीत डिलीट करण्यात आले असून माझे नाव या मतदारसंघात राहणार आहे का, असा प्रश्नही आ संजय जगताप यांनी तहसीलदारांना केला.
प्रशासनाचा भोंगळ कारभार – दिलीप गिरमे
दोन अडीच तास ताटकळत रहावे लागते आहे. चुकीच्या पद्धतीने कामकाज सुरू आहे, मोठ्या प्रमाणात प्रशासकीय चुका आहेत असे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व नोटीस आलेले नागरिक दिलीप गिरमे यांनी सांगून प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा निषेध केला. आत गेल्यावर केवळ मतदार नाव कायम असल्याचा शिक्का मारून पाठवण्यात येते. मग सुनावणीचा फार्स कशासाठी असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित करून गोरगरीब जनता चुकीच्या पद्धतीने शासनाच्या दरबारी बांधण्याचे काम केल्याच्या भावना व्यक्त केल्या.