जिल्हा परिषद शाळेतील स्थिती : म्हणावा तसा विकास नाही
मंगेश रत्नाकर
नारायणगाव – वारूळवाडी (ता. जुन्नर) हे 20 हजार लोकसंख्येचे असून गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत एकूण उपस्थित विद्यार्थ्यांच्या 10 टक्के विद्यार्थी स्थानिक कुटुंबातील शिक्षण घेत आहेत. बाकीचे विद्यार्थी हे कामधंद्याच्या किंवा व्यवसायाच्या निमित्ताने बाहेरून आलेल्या कुटुंबातील आहेत.
2 जानेवारी 1934 रोजी स्थापना झालेली सर्वांत जुनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. सुरुवातीच्या काळात विद्यार्थी संख्या चांगली होती; परंतु आज विद्यार्थी संख्या रोडावलेली आहे. आज 198 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पहिली ते सातवीपर्यंतच्या वर्गांसाठी सात शिक्षक कार्यरत आहे. शाळेत स्वतंत्र अद्यावत ग्रंथालय नाही; परंतु विद्यार्थ्यांना वाचनासाठी लहान-मोठे 700 ते 800 पुस्तके उपलब्ध आहेत. पिण्यासाठी स्वतंत्र पाण्याची टाकी असून स्वच्छातागृहाची सुविधा आहे.
शाळा वेताळ बाबा देवस्थान ट्रस्टच्या खासगी जागेत असल्याने शासनाकडून विद्यार्थ्यांना सुविधा निर्माण करण्यासाठी निधी उपलब्ध होत नाही. त्यामुळे शाळेचा आजपर्यंत म्हणावा तसा विकास होऊ शकला नाही. आजही शाळेच्या छतावर पत्रे दिसून येतात. पावसाळ्यात शाळेचे छत गळत असल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या. शाळा वाहतुकीच्या रस्त्यावर असूनही विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळेच्या चहुबाजूने कायमस्वरूपी बंदिस्त सुरक्षा भिंतीचे बांधकाम झालेले नाही.
शिवाय शासनाकडून 10 वर्षांपासून देवस्थान ट्रस्टला जागेचे भाडे मिळाले नाही. शाळाबाह्य वेळेत अनेक तळीराम शाळेच्या आवारात मद्यप्राशन करीत असल्याच्या तक्रारी आहेत. विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी झोके, घसरगुंडी किंवा अन्य साधने उपलब्ध नसल्याने परिसरातील इतर शाळांच्या तुलनेने विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षणाचे वातावरण उपलब्ध नाही. त्यामुळे अनेक पालकांना आपल्या मुलांना इच्छा व आर्थिक परिस्थिती नसतानाही खासगी शाळेत घालावे लागत आहे.
वारुळवाडी ग्रामपंचायतीने लक्ष घालून इमारतीस रंगरंगोटी करून इमारतीवरील पत्रे बदलले आहे. वेळोवेळी शाळेला लागणारी आर्थिक मदत आम्ही करीत असतो. इमारतीच्या बांधकामासाठी ग्रामस्थांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल.
-राजेंद्र मेहेर, सरपंच, वारूळवाडी
शाळेच्या विकासासाठी प्रयत्न सुरू आहेत. शिक्षकांनी मनापासून काम करणे आवश्यक असून स्थानिक ग्रामस्थ व सरपंचांशी चर्चा करून विद्यार्थ्यांच्या आनंददायी शिक्षणासाठी प्रयत्न करू.
– बाळासाहेब मेहेर, अध्यक्ष, शाळा समिती
वारुळवाडीची जिल्हा प्राथमिक शाळा खाजगी जागेत असल्याने शाळेच्या विकासासाठी शासकीय निधी खर्च करता येत नाही. त्यामुळे शाळा अजूनही जुन्या स्थितीत आहे. शाळेची जागा जिल्हा परिषदेकडे हस्तांतरीत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. शिक्षकांशी बोलून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रयत्न करणार.
– अनिता शिंदे, गटशिक्षणाधिकारी, जुन्नर