राजगुरूनगर -केंद्र शासनाने केलेली कांदा निर्यातबंदी त्वरित उठवावी, अशी मागणी खेड तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने करण्यात आली असून तसे झाले नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
याबाबतचे निवेदन आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार सुचित्रा आमले यांना देण्यात आले. यावेळी पक्षाचे तालुकाध्यक्ष कैलास सांडभोर, जिल्हा परिषदेतील माजी सभापती अरुण चांभारे, ज्येष्ठ विधिज्ञ ऍड. सुखदेव पानसरे, ऍड. अरूण मुळुक, बाळासाहेब सांडभोर, ऍड. बाळासाहेब लिंभोरे, ऍड. अतुल गोरडे, ऍड. बिभीषण पडवळ, ऍड. पवन कड, ऍड. सुनील वाळुंज यांच्यासह पक्षाचे कार्यक्रते उपस्थित होते.
करोना काळात शेतमालाचे व्यवहार ठप्प राहिल्याने मुळात कांद्यासारखा शेतमाल सडून मोठे नुकसान झाले आहे. निर्यात होऊ लागल्याने कांद्याला वाढीव दर मिळून शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील असे चित्र होते. केंद्र सरकारने त्यावर बंदी घातल्याने शेतकरी वर्गात मोठा असंतोष पसरला आहे. केंद्र सरकारने हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अन्यथा आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात तीव्र आंदोलन केले जाईल, असे निवेदनात म्हटले आहे.