भोर – भोर तालुका अतिपर्जन्यवृष्टीचा तालुका म्हणून ओळखला जात असून दुर्गम डोंगरी असल्याने तालुक्यात वर्षभरात भात पीक हेच मुख्य आर्थिक उत्पन्नाचे साधन आहे. मात्र, याच भात पिकावर वर्षभराचे आर्थिक नियोजन होत असताना याच नियोजनावर भात खरेदी करणार्या व्यापार्याने घाला घातला आहे. भोर तालुक्यातील हिरडस मावळ भागातील मौजे नांदगावच्या ८ शेतकऱ्यांना आनेवाडीतील भात व्यापारी याने गंडा घालीत शेतकऱ्यांची फसवणूक केली असल्याचे शेतकरी हनुमंत पर्वती कुडले यांनी सांगितले.
मागील काळात शेतकरी भात पीक मळून झाल्यानंतर भात भरडून तांदूळ तयार करीत होते. मात्र, सध्या शेतकरी वर्ग भाताची भरडणी न करता भात विक्री करीत असतात. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर नांदगाव येथील शेतकरी हनुमंत पर्वती कुडले आणि इतर ७ शेतकरी यांनी शेतात पिकवलेले इंद्रायणी जातीचे भात स्थानिक दलालाद्वारे आनेवाडी (जि. सातारा) येथील भात व्यापारी निलेश रवींद्र फरांदे यांना विक्री केले.
व्यापाऱ्याने भात ताब्यात घेताना शेतकऱ्यांना काही रोख रक्कम व काही पुढील चार दिवसांचा चेक दिला होता. दीड महिना उलटून गेला तरी व्यापाऱ्याने शेतकऱ्यांना दिलेले उर्वरित रकमेचे चेक बँकेत वठले गेले नसल्याने शेतकऱ्यांची मोठी फसवणूक झाली आहे. अशीच घटना वीसगाव खोऱ्यातील बाजारवाडी गावात घडली आहे. भोर तालुक्यातील सोयाबीन व्यापाऱ्याने आठ ते दहा शेतकऱ्यांना फसवल्याचे समोर येत आहे. शेतकऱ्यांना फसवणाऱ्या व्यापाऱ्यांची टोळी भोर तालुक्यात सक्रिय असून या फसव्या व्यापाऱ्यांना आवर कोण घालणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.