पाण्याअभावी पुरंदर तालुक्यातील स्थिती : हातातोंडाशी आलेला घास जाण्याची भीती
समीर भुजबळ
वाल्हे – पुरंदर तालुक्यातील खरीप हंगामातील बाजरीचे पीक आता ऐन, फुलोऱ्यांत असलेल्या बाजरीच्या कणसांना पावसाची नितांत गरज भासत असताना, पाऊस मात्र पडत नसल्याने, शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या बाजरी पिकाचा घास, हातातून जातोय की काय या विचाराने शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे.
यावर्षी मान्सूनपूर्व पाऊस पडला नसल्याने तसेच मान्सून पाऊस जुलै महिन्यात रिमझीम पाऊस पडल्याने, वाल्हे व परिसरातील काही शेतकऱ्यांनी धाडस करून, वाल्हे व परिसरात शेतकरीवर्गांनी बाजरी पेरणी जवळपास 460 हेक्टर क्षेत्रामध्ये पुढील काळात पाऊस पडेल या आशेवर बाजरीची पेरणी केली होती.
तसेच काही शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांची मूग, उडीद, तूर, भुईमूग, सूर्यफूल, सोयाबीन आदी पिकांची पेरणी केली होती. मात्र, पूर्ण खरीप हंगामात पाऊसच पडला नसल्याने यातील काही शेतकऱ्यांनी उपलब्ध पाणीसाठ्या नुसार पाणी पिकांना दिले होती. मात्र, आता विहिरी, तलाव, बंधारे, ओढे-नाले आटून गेले असल्याने पिके आता पाण्यावाचून करपू लागली आहेत.
वाल्हे परिसर बाजरीचा आगारा म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र, येत्या काही दिवसांतच पाऊस पडला नाही, तर, बाजरी पिक धोक्यात येणार असल्याची माहिती शेतकरी कैलास भुजबळ, भाऊसाहेब पवार, शरद यादव यांनी दिली.