‘प्रभात’चा दणकागावात स्वच्छता मोहीम सुरू
ग्रामपंचायतीकडून दंडात्मक कारवाई सुरू
महाळुंगे इंगळे – “महाळुंगे इंगळे की कचऱ्याचे गाव?’ या मथळ्याखाली दैनिक “प्रभात’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच झोपेचे सोंग घेतलेली ग्रामपंचायत खडबडून जागी झाली अन् स्वच्छता करीत सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांकडून दंड आकारला जात आहे. अस्वच्छता करणाऱ्यांकडून 500 ते 1000 रुपये दंड आकारला जात असून आतापर्यंत 40 हजारांचा दंड वसूल करण्यात आला. दरम्यान, या वृत्तामुळे गावात स्वच्छता सुरू झाल्याने नागरिकांनी “प्रभात’चे आभार मानले आहेत.
महाळुंगे इंगळे अध्यात्मिक वारसा असणारे गाव अस्वच्छतेने ग्रासले आहे. स्वच्छतेचे महत्व नसणाऱ्या परप्रांतीय लोकांकडून येथे रस्त्यावर कचरा टाकून गावात अस्वच्छता निर्माण करणारे तसेच प्लॅस्टिक पिशवी ठेवणाऱ्या दुकानदारांवर ग्रामपंचायतकडून कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे.
महाळुंगे इंगळे ग्रामपंचायतीच्या हद्दीत रस्त्यावर रात्रीच्या वेळी आसपासच्या गावातील भाजीविक्रेते, भाडेकरू कचऱ्याच्या पिशव्या टाकत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे, यामुळे गावात विदारक चित्र निर्माण होत आहे. रस्त्याच्या शेजारी कचरा टाकल्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. असा रात्रीच्या वेळी कचरा टाकणाऱ्या भामट्यांवर ग्रामपंचायत कठोर कारवाई करून त्यांच्या इज्जतीचा पंचनामा देखील करणार आहे.
सरपंच, उपसरपंच, महाळुंगे ग्रामपंचायत हद्दीत रस्त्याच्या कडेने कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर पुढील काळात दंडात्मक कारवाई करण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे. तर आगामी काळात गावाला निर्मल ग्राम करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याची माहिती सरपंच मंगल भोसले यांनी दिली.
गावातील नागरिकांच्या मागणीनुसार ग्रामपंचायतीने गेल्या पाच ते सहा दिवसांपासून पहाटेच्या वेळी कचरा टाकणाऱ्या ग्रामस्थांवर प्रतिबंध करून दंडात्मक कारवाई केली आहे
– मंगल भोसले, सरपंच, महाळुंगे इंगळ