दहा वर्षांपूर्वीचे जीर्ण ढापे काढले : राजगुरूनगरकरांना दिलासा
राजगुरुनगर : राजगुरुनगर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या केदारेश्वर बंधाऱ्याचे दहा वर्षांपूर्वीचे ढापे काढून त्यांची ढापे दुरुस्ती करून बसविण्यात आल्याने पाणी गळती थांबणार आहे.
राजगुरुनगर शहराला पाणीपुरवठा भीमा नदीवरील केदारेश्वर बंधाऱ्यातून केला जातो. शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे, असे असताना बंधाऱ्यात साठवण केलेले पाणी काही काळातच संपत होते. दहा वर्षांपूर्वीचे ढापे आहे. त्या स्थितीत दरवर्षी बसवले जात होते. त्यामुळे ते जीर्ण झाले होते. त्यातून मोठी पाणी गळती होत होती. यावेळी नगरपरिषदेने हे ढापे काढून त्याची दुरुस्ती केली तर काही जीर्ण झालेले ढापे बदलण्यात आले. नादुरुस्त व जीर्ण झालेले ढापे काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. माजी नगराध्यक्ष बापूसाहेब थिगळे यांनी स्वतःच्या अनुभवावर गॅस कटरच्या सहाय्याने हे जुने जिंर्ण झालेले ढापे काढण्यास मदत केली.
राजगुरुनगर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बंधारा जुना झाला आहे. त्यात पाणीसाठा करताना बसविलेले ढापे दहा वर्षापूर्वीचे होते ते पाण्यात असल्याने व त्यांना गंज चढल्याने नादुरुस्त झाले. त्यामुळे होणारी गळती रोखण्यासाठी तब्ब्ल 95 ढापे काढून त्याची दुरुस्ती करून ते बदलण्यात आले आहेत. पाण्याची गळती यापुढे होणार नाही. बंधाऱ्याखालील घाण पाणी ढापे बसविल्याने बंधाऱ्याच्या पाण्यात येणार नाही. त्यामुळे पाणी शुद्ध राहण्यास मदत होणार आहे. बंधाऱ्यात एका गाळ्यात प्रत्येकी तीन ढापे बसविले आहेत.
केदारेश्वर बंधाऱ्यात आठ दिवस पुरेल एवढा पाणी साठा शिल्लक आहे. चास कमान धरणातून पाणी सोडण्याची मागणी केली आहे. चासकमान धरणातून केलेली पाणी योजना अजूनही अपुरी असल्याने शुद्ध पाण्याच्या प्रतीक्षेत नागरिक आहेत. योजनेचे 80 टक्के काम पूर्ण झाले असून 20 टक्के काम बाकी असल्याने अजूनही नागरिक चास कमान धरणातून होणाऱ्या पाणी योजनेच्या प्रतीक्षेत आहेत.
पाणीक्षमता वाढणार
याबाबत माजी नगराध्यक्ष बापूसाहेब थिगळे म्हणाले की, राजगुरुनगर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बंधाऱ्याचे ढापे गेली दहा वर्षे काढले नव्हते. ते जीर्ण झाल्याने पाणी गळती होत होती. यावर्षी सर्व ढापे बाहेर काढून त्याची दुरुस्ती करून पुन्हा बसविले आहेत. ढापे निघत नव्हते. ते गॅस कटरच्या साहाय्याने काढले ते काढण्यासाठी माणूस उपलब्ध न झाल्याने स्वतः तेथे उतरून कामगारांना ते काढून दिले. नव्याने दुरुस्त करून ढापे बसविल्याने बंधाऱ्यातील पाणी क्षमता वाढणार असून पाणी गळती रोखली जाईल.