राजगुरूनगर -दिवाळी पाडवा आणि भाऊबीज एकाच दिवशी आल्याने पुन्हा एकदा लॉकडाऊन काळापासून संकटात आलेली लालपरी नव्या दमाने प्रवासी घेऊन रस्त्यावर धावू लागली आहे.
लॉकडाऊन अगोदर राजगुरूनगर बस स्थानकातून सरासरी 80 बसच्या 600 फेऱ्यामधून 18 ते 19 हजार प्रवाशांच्या वाहतुकीतून दिवसाला 8 ते 9 लाखांचे उत्पन्न मिळत होते. अनलॉक काळात बसेस तोट्यात चालवूनही करोनाच्या भीतीने प्रवाशांनी पाठ फिरवली होती.
मात्र, करोनाची भीती कमी होताच बसस्थानके प्रवाशांनी गजबजू लागली आहेत. राजगुरूनगर एसटी डेपोतून आंबेगाव आणि खेड तालुक्यांतील नेहमीच्या मार्गावर बससेवा कायमस्वरूपी सुरू होऊन मुक्कामी बसेस सोडण्यात आल्याने प्रवासी संख्येत वाढ होत आहे.
पंढरपूर, बार्शी, पैठण, मिरज, औरंगाबाद, नाशिक, मुंबई, बोरीवली अशा लांब पल्ल्यांची बससेवा सुरू झाली आहे. “घरी जाईल; पण एसटीनेच जाईल’ असे म्हणणाऱ्या ग्रामीण भागातील नियमित प्रवाशांची ये-जा वाढली आहे. ऐन दिवाळीत एसटी बससेवा सुरू झाल्याने मुंबई, पुणे, नाशिक औरंगाबाद आदी भागांतील नागरिकांना सोयीचे झाले आहे.
दिवाळी पाडव्याच्या मुहुर्तावर सर्व धार्मिक स्थळेही उघडण्यात आल्याने आणि मुलांसह कुंटुबीय आता पर्यटनाबरोबर तीर्थस्थळांवर गर्दी करीत आहेत, त्यामुळे एसटी महामंडळाचा गाडा आता रुळावर येत आहे.
ग्रामीण भागाबरोबरच लांबपल्याच्या बसेस सुरू झाल्याने या बस फेऱ्यांचे उत्पन्न वाढले आहे. सध्या राजगुरूनगर आगारातून दैनंदिन 55 बसच्या 250 फेऱ्या होत असून प्रवाशांची संख्या 9 ते 10 हजारांवर गेली आहे. सरासरी 5 लाखांचे दररोजचे उत्पन्न मिळत आहे.
– रमेश हांडे, आगारप्रमुख, राजगुरूनगर