पुणे -केंद्र सरकारने घातलेल्या निर्यातबंदीनंतर कांद्याचे दर कोसळतील ही शेतकऱ्यांना असणारी भीती फोल ठरली आहे. याउलट निर्यातबंदीच्या नंतरही कांद्याचे दर वाढताना दिसत आहेत. यावर आयातीचा निर्णय घेण्यात आला, त्याप्रमाणे नुकताच इराणचा कांदा जेएनपीटी बंदरात दाखल झाला आहे. याचा दरदेखील किलोला 60 रुपयांपेक्षा जास्त असल्याने व्यापाऱ्यांसह ग्राहकांनी देशी कांद्याला आपली पसंती दर्शवली आहे. त्यामुळे सध्या शंभरी गाठलेल्या कांद्याला ऐन दिवाळीत किलोला 150 रुपयांचा दर मिळाल्यास शेतकऱ्यांसाठी ती आनंदाची बातमी ठरणार आहे.
देशात महाराष्ट्राबरोबरच शेजारील आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्यात कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते; मात्र यंदा जून महिन्यात निसर्ग चक्रीवादळात पडलेला पाऊस, यानंतर झालेली अतिवृष्टी यांसारख्या नैसर्गिक संकटांमुळे हे उत्पादन प्रचंड घटले. सप्टेंबरमध्येही अतिवृष्टीचा तडाखा बसल्याने नव्याने लागवड केलेले कांदापीक उद्ध्वस्त झाले.
त्यामुळे दरवर्षी ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत बाजारात येणारा नवा कांदा यावर्षी सुमारे दोन ते तीन महिने उशिरा येणार आहे. साठवलेला उन्हाळी कांदा वातावरणातील बदलामुळे सडला. सध्या अनलॉकनंतर हॉटेल, रेस्टॉरंट सुरू झाली आहेत. तेथूनही कांद्याची मागणी वाढलेली दिसते. साहजिकच मागणी तसा पुरवठा होत नसल्याने कांद्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.
वाढती मागणी आणि दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारचा आटापिटा सुरू आहे. यासाठी कांदा आयातीवरील निर्बंध शिथील केले आहेत. आयात केलेला इराणचा कांदा दोन दिवसांपासून जेएनपीटी बंदरात दाखल होत आहे; मात्र मागणी लक्षात घेता हा 600 ते 700 टन कांदा कोणाला पुरणार? हाही प्रश्न आहेच. या कांद्याला किलोला 50 ते 60 रुपये दर मिळाला.
तर देशी कांद्याला सरासरी 70 ते 75 रुपये दर मिळत आहे. भारतीय कांद्याची गुणवत्ता आणि चव चांगली असल्याने व्यापारी आणि ग्राहकांची पहिली पसंती ही देशी कांद्यालाच आहे. त्यामुळे कांद्याचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात येण्यास डिसेंबर महिनाच उजाडेल, असा अंदाज कांदा व्यापाऱ्यांकडून वर्तविला जात आहे.
कांद्याची लागवड तीन हंगामात
भारतात कांदा लागवडीचे तीन हंगाम आहेत. पहिला खरीप, खरीपनंतर दुसरा आणि तिसरा रब्बी हंगाम. जुलै ते ऑगस्टमध्ये खरीप हंगामात कांदा लागवड केली जाते. हे पीक ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये बाजारात येते. खरिपानंतरच्या हंगामात दिवाळीआधी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये दुसऱ्या हंगामातील कांदालागवड केली जाते. तो कांदा जानेवारी-फेब्रुवारीत काढायला येतो. तर डिसेंबर-जानेवारीत उन्हाळी कांद्याची लागवड होते. तो कांदा मार्चनंतर काढला जातो. या तीनपैकी एक हंगाम पूर्णपणे वाया गेल्याने कांदाटंचाई निर्माण झाली आहे.
आरणीत साठवून ठेवलेला कांदा मोठ्या प्रमाणात सडला आहे. केवळ 25-30 टक्केच कांदा चांगला निघत आहे. त्यामुळे तुम्हाला चांगला दर दिसत असला तरी शेतकऱ्यांना याचा फायदा काहीच नाही. नव्याने कांदा लागवड करायची झाली तरी कांदा बियाणाचे दर पाच हजार रुपये किलोच्या पुढे गेले आहेत. रोपांचेही मोठे नुकसान झाले आहे. अतिवृष्टी झाल्याने सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होणारी कांदा लागवड यंदा महिनाभर लांबली आहे. महाग दराने रोपे घेणे परवडत नाही.
-दीपक नेहरकर, कांदा उत्पादक शेतकरी, येडगाव