बारामती/ जळोची -वंजारवाडी बारामती हद्दीमध्ये गुरुवार (दि. 22) पहाटे तीनच्या सुमारास कासवाची तस्करी करणाऱ्या दोघांना ग्राम सुरक्षा दलाच्या सतर्कतेमुळे बारामती ग्रामीण पोलिसांनी अटक केली.
राजू सजन गायकवाड (वय 22, रा. आमराई, बारामती) आणि विजय अरुण गायकवाड (वय 21, रा. आमराई बारामती), अशी अटकेतील दोघांची नावे आहेत. पोलिसांनी सांगितले की, वंजारवाडी हद्दीत दोन तरूण संशयस्पदरित्या फिरत होते.
दोघांना अटक केल्यानंतर ऑटो रिक्षामध्ये हे कासव मिळाले. याबाबत कसून चौकशी केली असता त्यांनी कासव विक्रीसाठी आणल्याचे निष्पन्न झाले.
त्यांच्या ताब्यातील कासव व ऑटोरिक्षासह दोघांना पुढील कारवाईसाठी वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, बारामती तालुका ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक योगेश लंगुटे, प्रमोद पोरे, हवलदार दत्तात्रय कुंभार , रमेश नागटिळक, संतोष मखरे, प्रशांत राऊत, मंगेश कांबळे, नंदू जाधव, विनोद लोखंडे, निखिल जाधव, अबरार शेख यांनी केली.
अमुक नख्या असलेले कासव जवळ बाळगल्यास पैशाचा पाऊस पडतो, अशा पद्धतीच्या अंधश्रद्धेमुळे कासवांची लाखो रुपयांना तस्करी होते. वंजारवाडीत घडलेला प्रकार हा अंधश्रद्धेचाच भाग असावा. दोन्ही आरोपींना वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे.
– अण्णासाहेब घोलप, पोलीस निरीक्षक, बारामती तालुका पोलीस ठाणे