भोर तालुक्यातील शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे : धूळवाफेवर भात पेरणीची लगबग
पश्चिम भागात पारंपरिक, पूर्व भागात आधुनिक शेती
भोर – काले मेघा, काले मेघा,
पानी तो बरसाओ
बिजुरी की तलवार नहीं,
बूँदों के बान चलाओ
मेघा छाये, बरखा लाये
घिर-घिर आये, घिर के आये
हे लगान चित्रपटातील गाणे भोर तालुक्यतील प्रत्येक शेतकऱ्याच्या ओठी सध्या आहे. दोन-तीन दिवसांपूर्वी झालेल्या वळवाच्या पावसामुळे भोरच्या पश्चिम भागातील शेतकऱ्यांनी धुळवाफेवर भाताच्या पेरणीला सुरुवात केली आहे. भाटघर आणि नीरा देवघर धरण खोऱ्यात भाताची पेरणी सुरू आहे. ग्रामीण भागातील गावांत शेतकरी कामात व्यस्त असून, पश्चिम भागात पारंपरिक पद्धतीने, तर पूर्व भागात आधुनिक पद्धतीने शेती केली जात असताना शेतकरी आता पावसाच्या प्रतीक्षेत आहे.
भोर तालुक्यात पश्चिम आणि पूर्व असे दोन भाग असून, पश्चिम भागात नीरा-देवघर धरण भागातील हिर्डोशी खोरे, तर भाटघर धरण भागातील भुतोंडे व वेळवंड खोऱ्यात महुडे खोरे, आंबवडे खोरे भागांत दरवर्षी वळवाचा पाऊस झाल्यावर धूळवाफेवर भात पिकाची पेरणी करतात. मात्र, यावर्षी पेरणीला थोडा उशीर झाला आहे. शिरगाव, दुर्गाडी, अभेपुरी, कुडली, गुढे, निवंगण शिळिंब, अशिपी, उंबार्डे, रायरी गावांत भाताची पेरणी सुरू झाली आहे, असे हिर्डोशी येथील शेतकरी संदीप धामुणसे यांनी सांगितले.
डोंगरी भागात भात हे मुख्य पीक असून, यात हळव्या आणि गरव्या जातीच्या भाताची लागवड केली जाते. गरव्या जातीत इंद्रायणी, बासमती, आंबेमोहर, पुसा बासमती, तामसाळ या जाती, तर हळव्या जातीत रत्नागिरी 24, कर्जत 184, सोनम इंडम, फुले, राधा या जातींच्या भाताची लागवड केली जाते. हळव्या जातीचे भातपीक 90 ते 100 दिवसांत तयार होते. त्याला पाणी कमी लागते, तर गरव्या जातीचे भात 100 ते 120 दिवसांत तयार होते याला पाणी अधिक प्रमाणात लागते.
भोर तालुक्यात इंद्रायणी जातीच्या तांदळाला सर्वाधिक मागणी असून, भोर तालुक्यात 80 टक्के इंद्रायणीची लागवड केली जाते. तालुक्याच्या पश्चिम भागातील भोंगवली भागातील गावे आणि वीसगाव खोरे भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यावर जमिनीला चांगला वापसा आल्यावरच भाताच्या बियाणांची पेरणी केली जाते. आधुनिक पद्धतीने गादी वाफ्यावर भाताच्या बियाणांची रोपवाटिका तयार करावी. त्यानंतर यांत्रिक पद्धतीने भाताची लागवड करा, यामुळे कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळते.
देवेंद्र ढगे, कृषी अधिकारी, भोर तालुका
लाखाचे नुकसान, भरपाई पाच हजार
भोर तालुक्याच्या पश्चिम भागात मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे डोंगरातील दरडी पडून मोठ्या प्रमाणात तालीचे व भात खाचरांचे नुकसान झाले होते. शासनाकडून ताली भात खाचरे याचे पंचनामे करण्यात आले होते; मात्र आलेली मदत एक हजार रुपयापासून पाच हजार रुपयांपर्यंतच आहे. येथे शेतकऱ्यांचे 50 हजार ते एक लाखापर्यंत नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांचे बॅंक खाते क्रमांक चुकवल्यामुळे नुकसान भरपाईचे पैसे मिळाले नाही, त्यामुळे शेतकरी कृषी विभागाच्या कार्यालयात हेलपाटे मारत असून, कृषी विभाग तहसील कार्यालयाकडे बोट दाखवत आहेत.