रमेश जाधव
रांजणी, दि. 27-अतिवृष्टीमुळे पशुखाद्य तयार होणाऱ्या मका भुईमुगाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे कच्च्या मालाच्या दरात 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. परिणामी पशुखाद्याचे दर गगनाला भिडले आहेत. या दरवाढीचा फटका पशुपालकांना निश्चितच बसला आहे. सध्या पशुखाद्याच्या दरात प्रतिकिलो दोन ते सहा रुपयांनी वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळते. त्यामुळे पशुपालकांना उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेती व्यवसायाला पशुपालनाची जोड देत अतिरिक्त उत्पन्नाचे साधन केले. अर्थात हे साधन करताना पशु पालकांनी जनावरांची संख्याही वाढवली. त्यामध्ये विशेषतः गायींचा समावेश करून दूध व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढवला. बहुतांश शेतकऱ्यांचा हाच मुख्य व्यवसाय बनला. जातिवंत दुधाळ जनावरे खरेदी करून दूध व्यवसायाला मोठे स्वरूप प्राप्त करून दिले गेले. यातून मिळणाऱ्या पैशांतून शेतकरी आपला प्रपंच चालवत आहे; मात्र गेल्या वर्षभरापासून पशुपालन व्यवसाय विविध संकटाच्या फेऱ्यात सापडला आहे. त्यामुळे पशुपालकांना पशूधन सांभाळणे देखील मुश्कील बनले आहे.
गेल्या वर्षी आलेल्या महापुराचा फटका पशुखाद्य उद्योगाला बसला डिसेंबर 2019मध्ये पशुखाद्याच्या दरात वाढ झाली होती त्यानंतर खाद्य तयार करण्यासाठीच्या कच्चा मालाच्या किमती उतरल्याने पशुखाद्याचे दरही कमी झाले. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला; परंतु पशुखाद्याचे दर काही काळ स्थिर राहिल्यानंतर दरात वाढ झाली. त्यामुळे दूध उत्पादकांना खाद्य दरात वाढ होत असल्याने मोठा फटका बसत आहे. दरम्यान गेल्या वर्षीप्रमाणेच यंदा अतिवृष्टी झाली. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले.
परिणामी दूध उत्पादनात घट झाली. माल कमी पडू लागला. पावसाने मका, ज्वारी पिकाचा दर्जा घसरला. त्यामुळे कच्च्या मालाचे दर वाढले. गतवर्षीच्या महापुराने दूध उत्पादक शेतकरी संकटात आहेत. त्यात करोना विषाणुच्या प्रादुर्भावाने प्रारंभी दुधाच्या मागणीत मोठी घट झाली. त्यातच दूधदर देखील कमी झाले. या साऱ्या संकटामुळे दूध उत्पादकांना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. पशुखाद्याच्या दरात वाढ झाल्याने पशुपालकांच्या मागे लागलेले शुक्लकाष्ट संपायला तयार नसल्याचे चित्र आहे.
दुधालाही दर नाही…
मुळातच दूध संघांनी दुधाला देण्यात येणाऱ्या भावात कपात करण्याचे धोरण अवलंबले आहे. तर खासगी दूध संघही शेतकऱ्यांना दुधाला चांगला बाजारभाव देत नाही. अशातच पशुखाद्याच्या दरात वाढ झाल्याने पशुपालक खऱ्या अर्थाने हवालदिल झाला आहे. पशुखाद्य तयार करण्यासाठी लागणारा कच्चामाल खरीप हंगामातील पिकाच्या माध्यमातून मिळतो. पीक चांगले असल्याने दर्जेदार पशुखाद्य तयार करता येते. यादरम्यान पशुखाद्याचे दर कमी होतात पशुखाद्याच्या मागणीतही वाढ होते, असा दावा पशुखाद्य तयार करणाऱ्या कारखानदारांनी केला आहे.
लॉकडाउन झाल्यापासून दुधाच्या दरात प्रति लिटरला सुमारे सहा रुपये कमी झाले आहेत. सातत्याने पशुखाद्याच्या दरात वाढ होत आहे. त्यामुळे आर्थिक ताळमेळ बसत नाह. दुधाच्या दरात वाढ झाल्याशिवाय दूध उत्पादकांचे प्रश्न सुटणार नाही.
-बाबाजी टेमगिरे, निघोटवाडी
पशुखाद्य महागले आहे. दूध उत्पादन वाढीसाठी खाद्याशिवाय दुसरा पर्याय नाही. खाद्य महाग झाले असले, तरी दर्जेदार खाद्य मिळत नाही. दहा दिवसांचा दुधाच्या बिलाचा हिशेब केला असता, यामध्ये खाद्यासाठी 2000, आरोग्याचा खर्च 2000, निव्वळ नफा 750 रुपये मिळाला. या पैशातून ताळमेळ कसा घालायचा असा प्रश्न आहे.
-प्रवीण थोरात पाटील, चांडोली बुद्रुक