धनगर जागर यात्रेत बारामतीच्या पवारांवर सडेतोड टीका
इंदापूर – महाराष्ट्रातील धनगर समाजाला 1990साली एसटी प्रवर्गामध्ये आरक्षण मिळत असताना, धनगर समाजाची दिशाभूल करून वेगळेच एनटीचे आरक्षण निर्माण केले. तसेच राष्ट्रीय पातळीवर धनगर आरक्षण एसटी प्रवर्गात असताना महाराष्ट्रातील धनगरांचे धनगड असे करून कोणी फसवणूक केली? हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. राज्यातील धनगर समाजाला एकत्र करण्यासाठी बी. के. कोकरे यांनी अपार प्रयत्न केले; मात्र त्यांनाही फोडाफोडीमध्ये माहीर असलेले बारामतीचे पवार यांनी फोडले. त्यामुळे आता राज्यकर्ती जमात बनायचे असेल तर, धनगर समाजाने संघटित होण्याची गरज आहे, असे प्रतिपादन आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले.
इंदापूर नगर परिषदेच्या प्रांगणात सोमवारी (दि. 16) दुपारी जागर यात्रेचे भाषण पडळकर यांनी केले. यावेळी सिद्धार्थ बेडगम, माऊली वाघमोडे, विलास वाघमोडे, माऊली चवरे, सचिन आरडे, आबासाहेब थोरात, गजानन वाकसे, तेजेश देवकाते, अजित मासाळ, आकाश कांबळे, बापूराव सोलनकर, अशोकभाऊ चोरमले, अण्णासाहेब काटे, भीमराव आरडे, अण्णासाहेब चोरमले, महेंद्र रेडके, संजय नरुटे, विनोद आरडे, अनिता खरात, नानासाहेब खरात, तानाजी नरुटे, आबासाहेब बंडगर आदी मान्यवर उपस्थित होते.
पडळकर म्हणाले, सरकारलादेखील धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्याची वेळ आली आहे, असे समजते आहे. सरकारने उच्च न्यायालयात तीन शपथपत्र सादर केले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर आरक्षण सुनावणीसाठी मदत केली असून, डिसेंबरमध्ये तीन दिवस केवळ आपल्या समाजासाठी कोर्टात वेळ दिला आहे. धनगर समाजाला आरक्षण न मिळाल्यास आमचा प्लॅन बी देखील तयार असून, रस्त्यावर उतरून न्याय मागण्याची तयारी केली आहे. त्यामुळेच मी तुम्हाला जागे करायला आलोय.
एसटीडीच्या गुलामगिरीतून समाजाने बाहेर पडावे
एस म्हणजे साहेब, टी म्हणजे ताई आणि डी म्हणजे दादा यांच्या गुलामगिरीतून आता धनगर समाजाने बाहेर पडावे आणि धनगर समाजाने राजासारखे वागावे. इंग्रजांनी गुलामगिरीची केलेली रचना हे एसटीडीची रचना आहे. त्यामुळे त्यांच्या गुलामगिरीतून मुक्त व्हा. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले होते, गुलामाला गुलामीची जाणीव करून दिल्यास तो आतून पेटून उठेल, त्यामुळे आता गुलामगिरी सोडा, एसटीडीच्या गुलामगिरीतून बाहेर पडा, असे पडळकर म्हणाले.