केंदूरमध्ये साखळी उपोषण सुरू : शेतकरी आक्रमक
शिक्रापूर – केंदूर (ता. शिरुर) परिसरातील बारा गावांच्या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना हक्काच्या पाण्याच्या मागणीसाठी अनेक दिवसांपासून आंदोलन सुरु केलेले असताना यापूर्वी पाबळ येथे रास्ता रोको आंदोलन झाल्यानंतर देखील शेतकऱ्यांना न्याय मिळत नसल्याने आता केंदूरमध्ये बारा गावांचे पाण्यासाठी साखळी उपोषण सुरु करण्यात आले आहे.
शिरुर तालुक्यातील दुष्काळी गावांची पाणी समस्या सोडवण्यासाठी पाणी संघर्ष समितीच्या माध्यमातून अनेक बैठका घेत लोकप्रतिनिधी तसेच नेत्यांच्या देखील बैठका घेण्यात आल्या. मात्र, समस्या सुटत नसल्याने अखेर काही गावातील शेतकऱ्यांनी पाबळमध्ये रास्ता रोको करीत शेतकऱ्यांना पाणी मिळाले नाही तर उपोषणाचा इशारा दिलेला असताना
आता केंदूरमध्ये बारा गावांतील शेतकऱ्यांच्या वतीने पाण्याच्या मागणीसाठी साखळी उपोषण सुरु करण्यात आले आहे. दररोज केंदूर, पाबळ, धामारी, मोराची चिंचोली, वरुडे, कान्हूर मेसाई, मिडगुल वाडी, खैरेवाडी, खैरेनगर, सोनेसांगवी, हिवरे, लाखेवाडी या गावांतील शेतकरी साखळी उपोषणाला बसणार आहेत.
धामारी गावातील माजी सरपंच संपत कापरे, शिवाजी पावसे, बाळासाहेब चौधरी, अर्जुन भगत, बाळासाहेब डफळ, मनोहर डफळ, सरपंच अमोल थिटे, भरत साकोरे, सूर्यकांत थिटे, बाळासाहेब साकोरे, अमोल सोनवणे, सुरेश गावडे, दौलत पऱ्हाड, सतीश गावडे, ग्रामस्थ व शेतकरी साखळी उपोषणाला बसले आहेत. राज्य शासनाने वेळीच लक्ष देऊन बारा गावातील शेतकऱ्यांना शेतीसाठी हक्काचे पाणी द्यावे, अशी मागणी केली आहे.
या दिवशी होणार शेतकऱ्यांचे उपोषण
21 नोव्हेंबर – केंदूर , 22 नोव्हेंबर – पाबळ, 23 नोव्हेंबर – धामारी, 24 नोव्हेंबर – मोराची चिंचोली, 25 नोव्हेंबर – कान्हूर मेसाई व मिडगुलवाडी, 26 नोव्हेंबर – खैरेवाडी, 27 नोव्हेंबर – खैरेनगर, 28 नोव्हेंबर – सोने सांगवी, 29 नोव्हेंबर – हिवरे, 30 नोव्हेंबर – लाखेवाडी.