सासवड – शेतकऱ्यांच्या नावाने “घसा’ कोरडा होणाऱ्या राज्यातील राजकीय धूळवडीमध्ये शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्यात आलंय. अगोदर मॉन्सून खोळंबला असताना “बिपरजॉय’ चक्रीवादळाने बाष्प खेचून नेले. त्यामुळे तळकोकणात मुक्कामी असलेला मॉन्सून सक्रिय होण्यासाठी चक्रीवादळ शमल्यानंतर बाष्प तयार होण्याची प्रतीक्षा करावी लागेल, अशा स्थितीत दिलासा देण्यासाठी थेट मदतीची भूमिका कधी घेतली जाणार? याकडे शेतकऱ्यांची नजर लागली आहे.
रोहिणी तसेच मृग नक्षत्र कोरडे गेल्याने खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. काही शेतकऱ्यांनी कोरड्या क्षेत्रात पेरणी केल्याने स्वाभाविकपणे पावसाअभावी दुबार पेरणीचे संकट ओढावण्याची स्थिती निर्माण झाली आहे. हे सारे छोटे शेतकरी असल्याने त्यांच्या मदतीचा विचार सरकारला करावा लागेल.
मूग, उडीद, ज्वारीच्या पेरण्यांवर शेतकऱ्यांकडून फुली मारली जाण्याची भीती आहे. कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार हे क्षेत्र सोयाबीन, तुरीकडे वर्ग होण्याची शक्यता आहे. पुणे विभागात 10.65 लाख हेक्टर खरिपाचे क्षेत्र आहे.
भाववाढीचे संकट?
काही शेतकरी रब्बीच्या ज्वारीसाठी मोकळे ठेवतील. म्हणजेच काय, तर मूग, उडीद, ज्वारीचे उत्पादन घटल्याने बाजारात भाववाढीचे संकट ओढावण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरीकडे वरुणराजा प्रसन्न झालेला नसल्याने जिल्ह्यातील काही भागांमध्ये टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. दरम्यान, पुणे विभगागात 109 गावे 444 वाड्यांमध्ये 86 टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असल्याने पाणीटंचाईची दाहकता लक्षात येत आहे.
जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत वेट?
हवामानशास्त्र अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार मेअखेरीस पक्ष्यांनी घरटी बांधण्यास सुरुवात केल्याचे आढळल्याने महिनाभर मॉन्सूनचा खोळंबा होईल, असे संकेत मिळाले होते. कृषी विभागाचे अधिकारी 12 ते 13 जुलैच्या आसपास पेरणीलायक पावसाची शक्यता वर्तवित आहे. हवामान विभागानुसार माहितीनुसार जुलै, ऑगस्टमध्ये राज्यात चांगला पाऊस अपेक्षित आहे.