नगर-कल्याण महामार्गावर डिंगोरे येथे भीषण अपघात
एकाच कुटुंबातील चौघांवर काळाचा घाला, तर सातारा येथील वडिल-मुलाचाही समावेश
ओतूर – नगर-कल्याण महामार्गावरील डिंगोरे (ता. जुन्नर) हद्दीतील अंजिराची बाग येथे तिहेरी भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चौघांसह आठ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन चिमुकल्यांचा देखील समावेश आहे. या चिमुकल्यांचे आयुष्य सुरू होण्यापूर्वीच त्यांनी या जगाचा निरोप घेतल्याने हळहळ व्यक्त होत आहे. तर अन्य चौघांमध्ये वडिल आणि मुलाचा समावेश आहे. दरम्यान, पिकअप चालकावर त्याच्या स्वत:सह अन्य सात जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी ओतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डिंगोरे हद्दीत येथे रविवारी (दि. 18) रात्री अकराच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. भाजीपाला घेऊन कल्याणच्या दिशेने निघालेल्या पीकअपने (एमएच 14 एचजी 1940) रिक्षाला (एमएच 03 बीवाय 9023) धडक दिली. नंतर पिकअप थेट ट्रकवर (एमएच 16 डीसी 1160) जाऊन धडकली. यात पिकपमधील चालक, कॅबिनमध्ये बसलेली त्याची पत्नी, मुलगा, मुलगी आणि मागे बसलेला हमाल अशा पाच जणांचा तसेच रिक्षातील तिघांचा असे एकूण 8 जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात रिक्षा, पिकअपचा चक्काचूर झाला आहे.
अपघाताची माहिती समजतात ओतूरचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे व त्यांचे पथक घटनास्थळी दाखल होत पोलिसांकडून स्थानिकांसह मदत कार्य सुरू केले होते. अपघातात मृत्यू झालेल्यांचे मृतदेह ओतूर येथे शवविच्छेदन करण्यात आले. दरम्यान, पिकअप चालकाने नियमभंग करून पिकअप चालवल्यप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आए. पुढील तपास ओतूर पोलीस करीत आहेत.
मृत्यू झालेल्यांची नावे
पिकअपमधील गणेश मस्करे (वय 30), कोमल मस्करे (वय 25), हर्षद मस्करे (वय 4), काव्या मास्करे (वय 6 सर्व रा. मढ, ता. जुन्नर) या एकाच कुटुंबातील चौघांसह पिकअपमधील हमाल अमोल मुकुंदा ठोखे (रा. जालना) तर रिक्षाचालक नरेश नामदेव दिवटे (वय 66, रा. पेडे परशुराम ता. चिपळूण जि.रत्नागिरी), मकरंद मधुकर खिरे (वय 54), समर्थ मकरंद खिरे (वय 16 दोघे रा. रेवडी, सातारा) असे मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.