पुणे – पुस्तकांमुळे वाचकाच्या कल्पनाशक्तीला वाव मिळतो. मात्र, वेब सीरिज, चित्रपटांतून प्रेक्षकांच्या कल्पना दृश्यांतून बंदिस्त केल्या जातात. पुस्तकांचे वाचन हा स्वसंवादाचा उत्तम मार्ग आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध हिंदी कवि डॉ. कुमार विश्वास यांनी केले. त्यामुळे पिझ्झा, कपडे अशा गोष्टींवरील खर्च कमी करा, पण पुस्तके विकत घेऊन वाचा, असे आवाहनही त्यांनी केले. पुस्तकांमुळे आत्म्याची इम्युनिटी वाढते. वाचलेले मनात राहते आणि कधी ना कधी कामी येते, असे त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय पुस्तक न्यासतर्फे आयोजित पुणे पुस्तक महोत्सवात कवि की कल्पना से या विषयावर डॉ. कुमार विश्वास यांनी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस विनोद तावडे, राष्ट्रीय पुस्तक न्यासचे संचालक युवराज मलिक, महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे, खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, भाजपचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे, प्रसेनजित फडणवीस या वेळी उपस्थित होते.
डॉ. विश्वास म्हणाले, चुकीच्या गोष्टींवर भाष्य करणे हे कवीचे काम आहे. सरकारे येतील आणि जातील, पण लोकशाही टिकली पाहिजे, असे अटलबिहारी वाजपेयी म्हणायचे. त्यामुळे कवींनी निर्भयपणे बोलले पाहिजे. चांगले असणे आणि यशस्वी असणे यात फरक आहे. त्यामुळे चांगले होण्यासाठी वाचणे आवश्यक आहे. वाचनाने माणूस चांगला होतो. प्रत्येक विषयाचे विविध आयाम समजून घेण्यासाठी विविध प्रकारची पुस्तके वाचली पाहिजेत. दरम्यान, गेल्या तीन दिवसांत तीन पुस्तकांशी, वाचनाशी संबंधित तीन विश्वविक्रम पुणे पुस्तक महोत्सवात नोंदवले गेले आहेत. पुस्तकांची दोनशेपेक्षा जास्त दालने या महोत्सवात असल्याचे राजेश पांडे यांनी सांगितले.
विचार करण्याची आवश्यकता
स्वराज्य म्हणजे केवळ पाच वर्षांतून एकदा येणाऱ्या निवडणुकीत मतदान करा आणि आपली जबाबदारी पूर्ण, असे मुळीच नाही. तुम्हाला पाच वर्षातील घडामोडींचा आत्मबोध घेऊन, विचार करण्याची आवश्यकता आहे, असे मत प्रसिद्ध पत्रकार सौरभ द्विवेदी यांनी व्यक्त केले.