सरकारच्या अनास्थेमुळे काम रखडले ?
स्थानिक नेत्यांचा बोगद्याला विरोध
रमेश जाधव
रांजणी – कुकडी प्रकल्पांतर्गत येणाऱ्या डिंभे ते माणिकडोह या दोन धरणांच्या दरम्यान सुमारे 13 किलोमीटर लांबीचा काढण्यात येणारा भूमिगत बोगदा केवळ शासकीय अनास्थेमुळे रखडला आहे . या भूमिगत बोगद्याच्या कामासाठी 350 कोटी रुपयांचा सुप्रमा प्रस्तावित आहे . हा सुप्रमा राज्य तांत्रिक सल्लागार समितीकडे सादर करण्यात आला आहे . मात्र, अजूनही पुढे कोणत्याही हालचाली झालेल्या नसल्याची खात्रीलायक माहिती पुढे आली आहे.
दरम्यान डिंभे ते माणिकडोह दरम्यानचा बोगदा होऊ नये आणि आंबेगावचे पाणी इतरत्र कुठेही जाऊ नये यासाठी स्थानिक नेत्यांनी या बोगद्याला विरोध केला असून कोणत्याही परिस्थितीत डिंभे ते माणिकडोह दरम्यानचा बोगदा होऊ न देण्याचा निर्धार आंबेगाव जुन्नरच्या स्थानिक नेतृत्वाने केला आहे.
डिंभे धरणात आणि परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने दरवर्षी धरण पूर्ण क्षमतेने भरते. माणिकडोह धरण परिसरात कमी पाऊस पडत असल्याने धरणात पूर्ण क्षमतेने पाणी साठा उपलब्ध होत नाही, ही बाब लक्षात घेऊन डिंभे ते माणिकडोह या दरम्यान भूमिगत बोगदा तयार करण्याचे नियोजन जलसंपदा विभागाने केले आहे . डिंभे धरणातील पाणी माणिक डोह धरणात भूमिगत बोगद्याद्वारे नेल्यामुळे पुढे हेच पाणी कुकडी डाव्या कालव्याद्वारे नगर , पुणे , सोलापूर जिल्ह्यातील 95 हजार हेक्टर क्षेत्रातील सिंचनासाठी देण्यात येणार आहे.
डिंभे धरण हे सर्वात मोठे धरण आंबेगाव तालुक्यात असून, पाणी साठवण क्षमता 12.50 टीएमसी आहे. माणिकडोह धरण जुन्नर तालुक्यात असून पाणी साठवण क्षमता 10.17 टीएमसी आहे. डिंभे धरणाच्या परिसरात पावसाळ्याच्या दिवसात कायमच जोरदार पाऊस होतो. या धरणात पाणीसाठा मुबलक असतो. या उलट माणिकडोह धरणाच्या परिसरात अतिशय कमी पाऊस पडत असून, गेल्या 40 वर्षात केवळ दोन वेळाच हे धरण पाण्याने पूर्ण क्षमतेने भरले होते. एरवी केवळ 50 ते 60 टक्के पाणीसाठा या धरणात उपलब्ध होतो.
डिंभे डाव्या कालव्याला पर्याय
डिंभे डाव्या कालव्याला अनेक वर्षे झाल्यामुळे या कालव्याची कार्यक्षमता कमी झाली . त्याला पर्याय म्हणून या भूमिगत बोगद्याची संकल्पना पुढे आली. त्यासाठी 2010 साली या भूमिगत बोगद्यासाठी 350 कोटी रुपयांचा सुप्रमा तयार करण्यात आला. त्याचबरोबर बोगद्यासाठी संकल्पना सुप्रमा देखील तयार करण्यात आला; परंतु काही तांत्रिक कारणामुळे हा प्रस्ताव मागे पडला आणि पुन्हा दुसरा प्रस्ताव २०१५-१६ साली करण्यात आला आणि लागेचच हा प्रस्ताव सुप्रमासह शासनाकडे जलसंपदा विभागाने दाखल केला . त्याला शासकीय पातळीवर तत्त्वतः मान्यता देण्यात आली आहे .
वळसे पाटील यांच्या भूमिकेकडे लक्ष
डिंभे ते माणिकडोह या धरणांदरम्यान बोगदा होऊ नये म्हणून आंबेगाव तालुक्याचे लोकप्रतिनिधी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे . हा बोगदा होऊ नये म्हणून त्यांनी राष्ट्रवादीतून (शरद पवार गट ) फारकत घेतल्याचे बोलले जात आहे. कोणत्याही परिस्थितीत आंबेगाव -जुन्नर चे पाणी इतरत्र जाऊ न देता येथील शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये म्हणून वळसे पाटलांनी ही राजकीय भूमिका घेतल्याचे दिसते आहे. त्यामुळे डिंभे ते माणिकडोह या धरणांदरम्यान
काढण्यात येणारा भूमिगत बोगदा होईल का, याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत .