लालासाहेब पवार : कारखाना गळीत हंगामासाठी सज्ज
इंदापूर – नीरा-भीमा कारखाना आगामी सन 2023-24 च्या गळीत हंगामासाठी सर्व तयारीनीशी सुसज्ज झालेला असताना, शेतकऱ्यांची दिशाभूल व्हावी म्हणून खरी वस्तूस्थिती लक्षात न घेता कारखान्याच्या विरोधात जाणीवपूर्वक अपप्रचार केला जात आहे. संबंधित बॅंकेच्या कर्ज परतफेडी संदर्भात यापूर्वीच तडजोडीने मार्ग निघाला आहे. दरम्यानच्या काळात संबंधित बॅंकेने कामकाजाचा भाग म्हणून कारखान्यास दिलेल्या नोटीशीचा विषय आता मार्गी लागला आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार यांनी दिली.
नीरा भीमा कारखान्याने संबंधित बॅंकेचे यापूर्वी एकूण 6 ते 7 वेळा कर्ज घेऊन नियमित परतफेड केली आहे. बॅंकेकडून कारखान्याने शेतकऱ्यांना ठिबक सिंचन अनुदान देणे, बेसल डोस व ऊस विकास योजनांसाठी रुपये 20 कोटींचे कर्ज घेतले; मात्र काही अडचणींमुळे परतफेडीस उशीर झाल्याने संबंधित बॅंकेने अवाजवी दंड व व्याजाचे आकारणी केल्याने त्या विरोधात कारखाना हा शेतकरी हितासाठी डीआरटीमध्ये अपिलात गेला.
संबंधित बॅंकेबरोबर या संदर्भात बैठका होऊन तडजोडीचा प्रस्ताव तयार करण्यात आला. बॅंकेने 18 महिन्यांचा कर्ज परफेडीचा प्रस्ताव दिला असून, आम्ही त्यांना 36 महिन्यांची मुदत मागितली. दरम्यानच्या काळात बॅंकेकडून कर्जा संदर्भात राज्यातील अनेकांना दिलेल्या नोटीशीच्या यादीमध्ये कारखान्याचे नाव आले; मात्र हा विषय आता तडजोडीने मार्गी लागला आहे. बॅंकांच्या कर्ज वसुलीच्या प्रक्रियेचा भाग म्हणून अशा नोटीसा येत असतात.
अपप्रचार करणाऱ्यांचे योगदान काय?
गेली पाच-सहा महिन्यांपासून ठराविक व्यक्ती कारखान्याच्या विरोधात जाणीवपूर्वक सतत बदनामीचा प्रयत्न करीत आहेत. या व्यक्ती नीरा भीमा कारखान्याच्या विरोधात इतर कारखान्यांच्या शेतकी अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन इतर कारखान्याला ऊस देण्याचे आवाहन करीत आहेत. त्यामुळे कारखान्याच्या हिताच्या विरोधात राजकीय द्वेषापोटी भूमिका घेणाऱ्यांनी कारखान्याच्या विरोधातील जाणीवपूर्वक अपप्रचार थांबवावा. नीरा भीमा कारखान्याच्या विरोधात अपप्रचार करणाऱ्यांचे कारखान्याच्या उभारणीत योगदान काय आहे. ज्यांनी एकाही सहकारी संस्थेची उभारणी केली नाही, अशांनी इतरांनी कष्टाने उभा केलेल्या व हजारो शेतकरी-कर्मचाऱ्यांचे प्रपंच अवलंबून आहेत अशा कारखान्या संदर्भात चिंता करायची गरज नाही, असे लालासाहेब पवार म्हणाले.
अंतिम हप्ता लवकरच जमा होणार
नीरा भीमा कारखाना गेली 23 वर्षे सक्षमपणे सुरू असून, कारखाना अडचणीतून बाहेर पडत आहे. कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकरी, कर्मचारी व इतर संबंधित घटकांच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या विकासामध्ये कारखान्याचे गेली 23 वर्षे मोठे योगदान आहे. कारखान्याकडून लवकरच मागील गळीत हंगामासाठी ऊस बिलाचा प्रति टन रु. 200 प्रमाणे अंतिम हप्ता शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. आगामी गळीत हंगामात ऊसाची कमतरता असल्याने कारखान्यांच्या दृष्टीने आगामी गळीत हंगाम हा आव्हानात्मक असा आहे. तरीही शेतकरी, सभासद, हितचिंतक यांच्या सहकार्याने कारखान्याचा आगामी गळीत हंगाम निश्चितपणे यशस्वी होईल, असेही यावेळी लालासाहेब पवार यांनी स्पष्ट केले.